लखनौच्या अलीगंज भागातील उषा मेहता मार्गावरील तीन मजली व्यावसायिक इमारतीत सोमवारी लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर समोर आलेल्या अधिकृत नोंदींनुसार, संबंधित इमारतीच्या मालकीमध्ये अनेक वेळा बदल झाले होते आणि कथित अनधिकृत बांधकामामुळे एकदा तिच्यावर पाडकामाची कारवाईही करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या वरच्या मजल्यावर ॲनिमेशन प्रशिक्षण केंद्र तर तळमजल्यावर पाळीव प्राण्यांचे दुकान आणि दवाखाना होता. सोमवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागल्यानंतर इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी आत अडकले. बचाव कार्यासाठी १९ अग्निशमन दलाच्या गाड्या, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि नागरी संरक्षण दलाच्या पथकांना पाचारण करण्यात आले. अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाला शेजारच्या इमारतींमधून भिंतींना तोडावे लागले.
अधिकृत नोंदीनुसार, अलीगंज सेक्टर-डीमधील एमएस/१०२/डी क्रमांकाची ही मालमत्ता १,९९२ चौरस फूट भूखंडावर उभी आहे. या जागेवरील निवासी इमारतीच्या आराखड्याला २० ऑगस्ट २०१४ रोजी मंजुरी देण्यात आली होती. मात्र, २०१६ मध्ये लखनौ विकास प्राधिकरणाने (एलडीए) येथे अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप करत कारवाई सुरू केली आणि १० मे २०१६ रोजी पाडकामाचा आदेश जारी केला होता. यानंतर मालकांनी या आदेशाविरोधात आक्षेप नोंदवत त्यांना योग्य सुनावणीची संधी देण्यात आली नसल्याचा दावा केला. तसेच बांधकाम मंजूर आराखड्यानुसारच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ५ जुलै २०१६ रोजी पाडकामाचा आदेश मागे घेण्यात आला.
दरम्यान, या मालमत्तेची मालकीही अनेक वेळा बदलल्याचे समोर आले आहे. मूळतः १९८० मध्ये लॉटरीद्वारे या भूखंडाचे वाटप करण्यात आले होते. २००५ मध्ये विजय कुमार आणि उषा यांच्या नावावर मालमत्ता हस्तांतरित झाली. त्यानंतर २०१३ मध्ये ती वीरेंद्र प्रताप शुक्ला आणि सुरेंद्र प्रताप शुक्ला यांना विकण्यात आली. पुढे ७ ऑगस्ट २०१४ रोजी एलडीएने नव्या मालकांच्या नावे अधिकृत नोंदणी केली.
प्राथमिक तपासात आग एअर-कंडिशनिंग डक्टमध्ये लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दाट धूर काही मिनिटांत संपूर्ण इमारतीत पसरल्याने वरच्या मजल्यांवर असलेले अनेक जण अडकले. तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांची कमतरता किंवा नियमांचे उल्लंघन यामुळे दुर्घटनेची तीव्रता वाढल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
‘बिनपाण्या’चा रोमांस वान्स-मुनीर यांचे पती, पत्नी और वो…
लखनऊमध्ये आग दुर्घटनेत कोचिंग सेंटरमधील १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू
कतारमधील रास लाफान गॅस प्रकल्पातील स्फोटाबाबत भारताकडून दुःख व्यक्त
झेल सुटले, सामना हातातून गेला!
नगरविकास आणि ऊर्जा मंत्री ए. के. शर्मा यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. बांधकाम नियम, अग्निसुरक्षा मानके आणि इतर संभाव्य त्रुटींची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या भीषण दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशी अहवालानंतर या दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि जबाबदारी स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
