वर्षभरात १ कोटी तरुणांना एआय प्रशिक्षण; स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग

‘जेन झी’साठी पंतप्रधान मोदींचा प्लॅन

वर्षभरात १ कोटी तरुणांना एआय प्रशिक्षण; स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग

विकसित भारताच्या उभारणीत देशातील तरुणांची भूमिका निर्णायक असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून ‘जेन झी’साठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. येत्या एका वर्षात देशातील १ कोटी तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयचे प्रशिक्षण देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले.

एका वर्षात १ कोटी तरुणांना एआय ट्रेनिंग

एआय हे भविष्यातील रोजगार, उद्योग आणि अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे साधन ठरणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने तरुणांच्या कौशल्यविकासावर मोठा भर दिला आहे. आगामी एका वर्षात १ कोटी तरुणांना एआय प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून तरुणांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडण्यासोबतच भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

जगभरात एआयमुळे कामाच्या पद्धती वेगाने बदलत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय तरुणांकडे केवळ पारंपरिक शिक्षण आणि पदवी न राहता एआय, डिजिटल तंत्रज्ञान आणि नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण असणे आवश्यक ठरणार आहे. १ कोटी तरुणांना एआय प्रशिक्षण देण्याच्या घोषणेमुळे भारतातील मोठ्या युवा वर्गाला या तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न होणार आहे. पंतप्रधानांनी विकसित भारताच्या प्रवासात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यांच्या ‘सप्तधारा’ विकास आराखड्यातही ‘टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन’ हा प्रमुख आधारस्तंभ आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाइन कोचिंग

एआय प्रशिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्याची घोषणाही मोदी यांनी केली. महागड्या कोचिंग क्लासेसमुळे अनेक कुटुंबांवर येणारा आर्थिक भार कमी करणे आणि विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

हे ही वाचा:

‘शस्त्रधारी नक्षलवाद’ संपवला, आता लक्ष्य ‘वैचारिक नक्षलवाद’!

विकसित भारतासाठी मोदींचा ‘सप्तधारा’ मंत्र

आशिया कपआधी दीप्तीचा गेमप्लॅन तयार

भारताचा परकीय चलनसाठ्यात विक्रमी वाढ; ७०७ अब्ज डॉलरचा टप्पा पार

क्रीडा क्षेत्रातही युवा टॅलेंट हवे

पंतप्रधान मोदी यांनी तरुणांसाठी क्रीडा क्षेत्रातील योजनांचाही उल्लेख केला. २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी आजपासूनच ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी टॅलेंट हंट आणि प्रशिक्षण सुरू करण्याचे त्यांनी सांगितले. भारत २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. एकीकडे AI आणि तंत्रज्ञानातील कौशल्यविकास, तर दुसरीकडे शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील संधी वाढवण्याच्या घोषणांमधून विकसित भारताच्या वाटचालीत Gen Z आणि युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न स्पष्ट झाला आहे.

Exit mobile version