हायकोर्ट लिपिक भरती परीक्षेत गोंधळ; सर्व्हर डाऊन, संतप्त विद्यार्थ्यांचा ठिय्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये संतप्त परीक्षार्थी रस्त्यावर

हायकोर्ट लिपिक भरती परीक्षेत गोंधळ; सर्व्हर डाऊन, संतप्त विद्यार्थ्यांचा ठिय्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला. अचानक आलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे शेकडो विद्यार्थ्यांची परीक्षा खोळंबली आणि परीक्षा केंद्रावर संतापाचे वातावरण निर्माण झाले.

या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी दूरवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतरच तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. परीक्षा वेळेत पूर्ण होईल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरच गोंधळ घालत नाराजी व्यक्त केली. परिस्थिती चिघळत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा:
सोनिया गांधींनी केलेल्या पापाला जनता माफ करणार नाही!

…किन्नौर कैलासचे दर्शन आणि गायिका हिमांशीने धर्म न सोडण्याचा घेतला निर्णय

उदय सामंतांच्या दौऱ्याआधी चाकण एमआयडीसीत रातोरात खड्डे बुजवले

वाराणसी विमानतळावर प्रवाशाच्या बंदुकीतून सुटली गोळी!

तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करणार, परीक्षा पुन्हा घेण्यात येणार का किंवा तांत्रिक अडचणीमुळे वेळ वाया गेलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ दिला जाणार का, याबाबत अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट निर्णय समोर आलेला नाही. त्यामुळे परीक्षार्थी प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.

विशेष म्हणजे, याच दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरनंतर कल्याणमधील एपीएमसी मार्केट परिसरातील परीक्षा केंद्रावरही गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. तेथे परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या संगणकाच्या की-बोर्डमध्ये बिघाड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे परीक्षा घेण्याच्या व्यवस्थेवरच विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सरकारी नोकरीसाठी महिनोनमहिने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रावरील तांत्रिक त्रुटींमुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाढत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे. आता या तांत्रिक बिघाडाबाबत परीक्षा प्रशासन काय निर्णय घेते आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version