अरुणाचलमध्ये पुराचा हाहाकार; ५ जवान बेपत्ता

भूस्खलनात चौघांचा मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर

अरुणाचलमध्ये पुराचा हाहाकार; ५ जवान बेपत्ता

अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला असून, पूर आणि भूस्खलनाच्या दोन भीषण घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात लष्करी छावणीतील दोन तात्पुरते निवारे वाहून गेले. या दुर्घटनेत सात लष्करी जवान पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी दोन जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, पाच जवान अद्याप बेपत्ता आहेत. शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पावसानंतर ही दुर्घटना घडली.

दिबांग व्हॅलीतील पसू पानी येथील ५व्या ग्रेनेडियर्सच्या लष्करी छावणीला अचानक आलेल्या पुराचा मोठा फटका बसला. पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की छावणीतील दोन शेल्टर काही क्षणांतच वाहून गेले. या घटनेनंतर बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कराने तातडीने शोध आणि बचाव पथके रवाना केली आहेत. ५व्या ग्रेनेडियर्सची दोन पथके या मोहिमेत सहभागी असून, त्यांना आयटीबीपीच्या ५८व्या बटालियनचे जवान, जीआरईएफच्या ६२ आरसीसीचे पथक, अरुणाचल प्रदेश पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवकांची मदत मिळत आहे. पसिघाट येथून एसडीआरएफचे पथकही अनिनीच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
क्रिकेटविश्वाचा देशाला सलाम!

हरमनप्रीतचा हुंकार; ‘वर्ल्ड कप जिंकायचाच!’

ऑपरेशन झेपेलिन… कोण आहे बिटर डायनास्ट? दिमागी नक्षलवादाचा भेसूर चेहरा

मूक योद्ध्याची शौर्यगाथा! ‘टायसन’चा स्वातंत्र्यदिनी सन्मान

दरम्यान, राज्याच्या अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातही भूस्खलनाने मोठी दुर्घटना घडली. केओजारिंग-ब्याचिंग रस्ता बांधकामाच्या ठिकाणी अचानक मोठी दरड कोसळली. या दरडीखाली अनेक कामगार आणि नागरिक अडकले. या दुर्घटनेत ताडू बाकी, ताजी राय, मार्कोश बसुमतारी आणि बाबुल अली या चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यापैकी बाबुल अली यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला असून, उर्वरित व्यक्तींच्या शोधासाठी बचावकार्य सुरू आहे.

भूस्खलनाची माहिती मिळताच नाचो पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा पथकांना दापोरिजोहून रवाना करण्यात आले असून, एसडीआरएफचे पथकही बचावकार्यात सहभागी झाले आहे. मात्र, डोंगराळ भागातील सततचा पाऊस, अस्थिर भूभाग आणि वाहतूक मार्गांवर निर्माण झालेले अडथळे यामुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरत आहे.

एकाच संध्याकाळी राज्यातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घडलेल्या या घटनांमुळे प्रशासनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दिबांग व्हॅलीत बेपत्ता असलेल्या पाच जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत, तर अप्पर सुबनसिरीमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशातील संवेदनशील आणि डोंगराळ भागांमध्ये प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.

Exit mobile version