हिंगणघाटमध्ये ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; तीन शाळकरी मुलींचा मृत्यू

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी जात असताना घडला अपघात

हिंगणघाटमध्ये ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; तीन शाळकरी मुलींचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये स्वातंत्र्यदिनी काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी जात असताना या मुलींवर काळाने घाला घातला. या घटनेमुळे हिंगणघाट परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट शहरातील आंबेडकर शाळेजवळ हा भीषण अपघात झाला. तीन शाळकरी मुली दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तिन्ही मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले; मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान तिन्ही मुलींचा मृत्यू झाला. समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख अशी मृत मुलींची नावे असल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा:
मूक योद्ध्याची शौर्यगाथा! ‘टायसन’चा स्वातंत्र्यदिनी सन्मान

त्याग, बलिदान देऊन मिळविलेले स्वातंत्र्य टिकवायला हवे!

स्वातंत्र्य दिनानिमित्त अंतराळातून तिरंग्याला खास ‘स्पेस सलाम’

सोनिया गांधींना गायची होती वंदे मातरमची फक्त दोन कडवी

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडलेल्या मुलींचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांमध्येही या घटनेमुळे संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. एकाच अपघातात तीन शाळकरी मुलींचा जीव गेल्याने हिंगणघाटमध्ये शोककळा पसरली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. ट्रॅव्हल्स बसच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का, तसेच बसचा वेग किती होता, यासह अपघाताच्या इतर कारणांचा तपास केला जात आहे. अपघातानंतर वाहतूक व्यवस्थाही काही काळ विस्कळीत झाली होती.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घडलेल्या या भीषण दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा आणि भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निष्पाप शाळकरी मुलींच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version