अंडर-१९ आशिया कपमध्ये भारताने शुक्रवारचा सामना यूएईविरुद्ध २३४ धावांनी जिंकत धडाकेबाज कामगिरी केली. दुबईतील आयसीसी अकादमीत झालेल्या या सामन्यात भारताचा सलामी फलंदाज वैभव सूर्यवंशीने ९५ चेंडूत १७१ धावांचा तुफानी डोंगर उभा केला.
सामन्यानंतर वैभव आणि भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे यांच्यातली मजेशीर चुरस चाहत्यांना भलतीच भावली.
एसीसीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आयुषने वैभवला विचारले की, यूएईविरुद्ध फलंदाजीसाठी उतरतानाची त्याची मानसिकता काय होती. यावर वैभवने मजेशीर शैलीत उत्तर दिले:
“मला मोठ्या खेळाडू आयुष म्हात्रेसोबत ओपनिंगची संधी मिळाली… यासाठी देवाचे आभार! एकदा सेट झालो की रन आपोआप येणारच, हीच विचारधारा होती.”
यानंतर आयुषने टोमणा मारत विचारले की, “तुझा स्कोअर तर ३००ला जाताना दिसत होता!“
यावर वैभवने हसत उत्तर दिले:
“मी प्रयत्न करत होतो, पण कॅप्टनचा आदेश होता— छक्के लागत राहिले पाहिजेत! छक्का मारताना मी आउट झालो. 50 षटके टिकोप टाकली असती तर ३०० नव्हे, ३००+ रन केले असते!”
पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध असल्याचे आयुषने सांगितले. यावर वैभवने आत्मविश्वासाने उत्तर दिले:
“संपूर्ण टूर्नामेंटमध्येच आम्ही तुफान खेळणार आणि जिंकणार!”
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ६ बाद ४३३ धावा केल्या. वैभवने केवळ ५६ चेंडूत शतक ठोकले, त्यात ९ चौकार आणि १४ षटकार होते. आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रानेही ६९-६९ धावांची महत्त्वाची भूमिका बजावली.
४३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईने ७ बाद १९९ धावा करत सामना गमावला.
