पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मुर्शिदाबादमध्ये आम जनता उन्नयन पार्टीचे (एयूजेपी) संस्थापक हुमायून कबीर यांच्या आगमनानंतर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पोलिसांशी बाचाबाची केली, ज्यामुळे संघर्ष उफाळून आला. मतदान प्रक्रियेदरम्यान पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात तणाव वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. जमावातील काही लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला, परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पोलिसांनी नाकारले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू आहे. दरम्यान, काही भागांतून संघर्षाच्या घटना समोर येत आहेत. मुर्शिदाबादमध्ये टीएमसी कार्यकर्ते आणि आम जनता उन्नयन पार्टीचे (एयूजेपी) संस्थापक हुमायून कबीर यांच्यात संघर्ष झाल्याचे समोर आले आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हुमायून कबीर आणि टीएमसी कार्यकर्ते एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. दरम्यान, सुरक्षा कर्मचारी हुमायून कबीर आणि टीएमसी कार्यकर्त्यांना मागे ढकलत असल्याचे दिसत आहे.
एयूजेपी प्रमुख हुमायून कबीर म्हणाले की, त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “मी माझ्या सर्व लोकांना शांत राहण्यास सांगितले आहे. मतदान आणि निवडणूक शांततेत पार पडावी अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांनी त्यात सहभागी व्हावे. कोणालाही मारणे, घाबरवणे किंवा धमकावणे हा माझा उद्देश किवा हेतू नाही,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरची महिला क्रिकेटपटूसह दोन साथीदार सेक्सटॉर्शन-खंडणीप्रकरणी अटकेत
दोन दिवसांत २ बलात्कार, १ हत्या; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येतील आरोपी अटकेत
इस्रायली हल्ल्यात लेबनॉनमधील महिला पत्रकार ठार
नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा राजीनामा
अधिकाऱ्यांनी हा देखील दुजोरा दिला की, एक दिवसापूर्वी त्याच परिसरात कच्चे बॉम्ब फेकल्याची घटना घडल्याची नोंद झाली होती, ज्यामुळे निवडणुकीच्या काळात या भागातील तणावपूर्ण वातावरणात भर पडली. मुर्शिदाबादमधील कथित कच्चे बॉम्ब हल्ल्यातील एका पीडिताने सांगितले, “काल रात्री साधारण ८ वाजता मी नमाज अदा करण्यासाठी बाहेर पडलो होतो. मी उभा होतो. दोन मुले आली आणि त्यांनी माझ्या पायाजवळ बॉम्ब फेकला. हुमायून कबीरच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे केले आहे.”
पश्चिम बंगालमध्ये सलग चौथ्यांदा सत्तेवर येऊ पाहणारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मागील निवडणुकीत दमदार कामगिरी करून सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवलेला भाजप यांच्यात हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सलग चौथ्या कार्यकाळासाठी प्रयत्नशील आहेत, तर मागील निवडणुकीत ७७जागा मिळवलेला भाजप राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी नव्याने जोर लावत आहे. पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा जागांसाठी पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात १५२ विधानसभा मतदारसंघांचा, तर दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांचा समावेश आहे. या टप्प्यात एकूण १,४७८ उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.







