“जबाबदारी माझी, प्रत्येक त्रुटी दुरुस्त करणार”

सीबीएसई OSM वादावर धर्मेंद्र प्रधानांची मोठी कबुली

“जबाबदारी माझी, प्रत्येक त्रुटी दुरुस्त करणार”

The Union Minister for Petroleum & Natural Gas and Steel, Shri Dharmendra Pradhan holding a press conference on Cabinet Decisions, in New Delhi on December 30, 2020.

CBSEच्या बारावीच्या निकाल प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या ऑन-स्क्रीन मार्किंग अर्थात OSM प्रणालीवरून देशभरात निर्माण झालेल्या वादानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रक्रियेत काही त्रुटी झाल्या असतील, तर त्याची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही आणि सर्व चुका दुरुस्त केल्या जातील,” असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. या विधानानंतर शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या चर्चेला आणखी वेग आला आहे.

यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीचा वापर केला. या पद्धतीमुळे मूल्यांकन अधिक वेगवान आणि पारदर्शक होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी गुणांमध्ये विसंगती असल्याचा आरोप केला. काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळाल्याचे समोर आले, तर काही विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार केली. सोशल मीडियावरही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संताप व्यक्त केला.
हे ही वाचा:
भारत- चीन यांच्यात सीमा चर्चा; काय होते मुद्दे?

वर्क फ्रॉम होममुळे बदलतोय घर खरेदीचा ट्रेंड

रशियाची सोन्याची विक्री वाढली

इबोला विषाणूचा सामना करणाऱ्या काँगोला भारताचा मदतीचा हात

वाद वाढल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांच्या प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने पाहत आहे. “काही तांत्रिक त्रुटी आमच्या निदर्शनास आल्या आहेत. त्या तातडीने दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला अन्याय होणार नाही, याची सरकार पूर्ण काळजी घेईल,” असे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी दोषींवर कठोर कारवाईचाही इशारा दिला. “जर कोणाची निष्काळजीपणा किंवा चुकीची भूमिका आढळली, तर संबंधितांना सोडले जाणार नाही,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापले आहे. विरोधकांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला. OSM प्रणाली हाताळणाऱ्या संस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर प्रत्युत्तर देताना धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करू नये, असे आवाहन केले. “विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण होणार नाही, याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी,” असे ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या मते, OSM प्रणालीमुळे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन अधिक अचूक आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लाखो उत्तरपत्रिका डिजिटल पद्धतीने स्कॅन करून तपासण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्याचे आता सरकारने मान्य केले आहे. शिक्षण मंत्रालयाने तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेऊन संपूर्ण प्रक्रियेचे पुनरावलोकन सुरू केले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुनर्मूल्यांकन प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी निकाल प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही महिन्यांत देशातील विविध स्पर्धा परीक्षा आणि निकाल प्रक्रियांवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात नीट पेपर लीक प्रकरणापासून ते केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालातील विसंगतीपर्यंत अनेक घटनांमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयासाठी ही केवळ तांत्रिक समस्या राहिलेली नसून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचे मोठे आव्हान बनले आहे.

Exit mobile version