सूर्यकांत यांनी शनिवारी त्यांच्या वादग्रस्त झुरळांबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले की, माध्यमांच्या एका गटाने त्यांच्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ लावला आणि ते देशातील युवकांवरील टीका केल्याचे खोटेच सांगितले.
“काल एका क्षुल्लक प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केलेल्या माझ्या वक्तव्यांचे माध्यमांच्या एका वर्गाने चुकीचा अर्थ काढला. हे वाचून मला दुःख झाले. मी विशेषतः त्या लोकांवर टीका केली होती ज्यांनी बनावट आणि खोट्या पदव्यांच्या मदतीने बार असोसिएशन सारख्या व्यवसायात प्रवेश केला आहे. अशाच प्रकारचे लोक माध्यमे, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही घुसले आहेत आणि त्यामुळे ते परजीवींसारखे आहेत. मी देशातील युवकांवर टीका केली, असे म्हणणे पूर्णपणे निराधार आहे,” असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले.
सरन्यायाधीशांनी पुढे सांगितले की त्यांना देशाच्या युवकांचा अभिमान आहे आणि ते विकसित भारताचे आधारस्तंभ आहेत. आपल्या वर्तमान आणि भविष्यातील मानवी संसाधनांचा मला अभिमान आहेच, पण भारतातील प्रत्येक युवक मला प्रेरणा देतो. भारतीय युवक माझ्याबद्दल मोठा आदर आणि सन्मान बाळगतात आणि मीही त्यांना विकसित भारताचे आधारस्तंभ मानतो, असे ते म्हणाले.
हा वाद त्या वेळी निर्माण झाला जेव्हा सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाला वरिष्ठ वकील दर्जा देण्यासंदर्भातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठाने काही टिप्पणी केली होती. सुनावणीदरम्यान खंडपीठाने याचिकाकर्त्या वकिलाला वरिष्ठ वकील दर्जासाठी आक्रमकपणे पाठपुरावा केल्याबद्दल फटकारले आणि त्याच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले. फेसबुकवर त्याने वापरलेल्या भाषेबद्दलही न्यायालयाने आक्षेप घेतला.
“संपूर्ण जग वरिष्ठ वकील होण्यासाठी पात्र असू शकते, पण किमान तुम्ही तरी पात्र नाही,” असे खंडपीठाने याचिकाकर्त्याला सांगितले.
भावनिक झालेल्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले की जर दिल्ली उच्च न्यायालयाने त्या वकिलाला वरिष्ठ वकील दर्जा दिला, तर त्याच्या व्यावसायिक वर्तनामुळे सर्वोच्च न्यायालय तो निर्णय रद्द करेल. वकिलाच्या सोशल मीडिया वर्तनाचा संदर्भ देत सरन्यायाधीश म्हणाले, “समाजात आधीच व्यवस्थेवर हल्ला करणारे परजीवी आहेत आणि तुम्हालाही त्यांच्यात सामील व्हायचे आहे का?”
हे ही वाचा:
हत्या प्रयत्न, राजकीय हिंसाचार प्रकरणी टीएमसी नेते सैदुल खान अटकेत
आयसिसचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता ठार
मालदीवमध्ये पाच इटालियन डायव्हर्सचा मृत्यू
नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी मुख्य सूत्रधार पुण्यातून ताब्यात
ते पुढे म्हणाले, “काही तरुण झुरळांसारखे आहेत, ज्यांना रोजगार मिळत नाही किंवा व्यवसायात स्थान मिळत नाही. त्यापैकी काही जण माध्यमांमध्ये जातात, काही सोशल मीडिया, आरटीआय कार्यकर्ते किंवा इतर कार्यकर्ते बनतात आणि मग प्रत्येकावर हल्ले करू लागतात.”
खंडपीठाने स्पष्ट केले की वरिष्ठ वकील दर्जा हा एखाद्या वकिलाला दिला जाणारा सन्मान आहे, तो आक्रमकपणे मागण्याची गोष्ट नाही. तुम्ही त्याचा पाठपुरावा करत आहात. हे योग्य दिसते का?” असा प्रश्न न्यायालयाने विचारला. तसेच वरिष्ठ वकील दर्जा हा केवळ प्रतिष्ठेचे प्रतीक बनला आहे का, असा सवालही केला.
खंडपीठाने याचिकाकर्त्याला विचारले की त्याच्याकडे इतर खटल्यांचे काम नाही का आणि वरिष्ठ वकील दर्जा मागणाऱ्या व्यक्तीसाठी असे वर्तन योग्य आहे का ? सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अनेक वकिलांच्या पदव्यांच्या सत्यतेबाबतही चिंता व्यक्त केली. सरन्यायाधीशांनी म्हटले की काळा कोट घालणाऱ्या अनेक वकिलांच्या पदव्यांची सत्यता संशयास्पद असल्याने त्या तपासण्यासाठी सीबीआयकडे चौकशी सोपवण्याचा विचार न्यायालय करत आहे.
न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की बार कौन्सिल ऑफ इंडिया या मुद्द्यावर कारवाई करणार नाही कारण “त्यांना मतांची गरज आहे. न्यायालयाच्या निरीक्षणांनंतर याचिकाकर्त्या वकिलाने खंडपीठाची माफी मागितली आणि याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. सर्वोच्च न्यायालयाने ती विनंती मान्य केली.
