धुरंधर राजकारणी

धुरंधर राजकारणी

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आदी महत्वाच्या महापालिकांचे निकाल काल जाहीर झाले. भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले. महाराष्ट्रात भाजपाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला. जे काही भाजपाच्या वाट्याला आले त्यामागे निव्वळ कष्ट आहेत. अप्रतिम रणनीती आहे, नियोजन आहे, उत्कृष्ट व्यवस्थापन आहे. डोक्यात चोवीस तास राजकारण असलेल्या फडणवीसांचा पार्टटाईम राजकारणवाले मुकाबला करू शकत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.

भाजपाच्या प्रत्येक यशस्वी नेत्याने स्वत:च्या व्यक्तिमत्वात एक कुशल सीईओचे गुण विकसित केलेले आहेत. त्यांच्या डोक्यात कायम टार्गेट असते. रोडमॅप असतो. त्यासाठी त्यांच्या टीमला ते सतत मोटीव्हेट करण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला त्याचे लक्ष्य दिलेले असते. ते गाठण्यासाठी त्यांना नियमितपणे दिशादर्शन केले जाते. हे फक्त निवडणुकीच्या काळात घडत नाही. हा त्यांचा दिनक्रम असतो. रोज ठाण मांडून कार्यालयात बसायचे, लोकांना भेटायचे, त्यांची कामे मार्गी लावायची. कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची, त्यांना कामे सोपवायची. पदाधिकारी कार्यकर्त्यांचे नियमितपणे प्रशिक्षण घ्यायचे. बैठका घ्यायच्या.

हे ही वाचा:

पीएमसीच्या पोर्टलवर नावांचा गोंधळ!

दिल्ली हे खलिस्तानी, बांगलादेशस्थित दहशतवाद्यांचे लक्ष्य

राज ठाकरेंचा फायदा इतरांना, पण मनसेची झोळी रिकामीच

मुंबईत महिला नेतृत्वाच्या विजयाचा झंझावात!

याचा फायदा म्हणजे पक्षाचे कार्य, कार्यक्रम प्रत्येकाला ठाऊक असतो. पक्षाची भूमिका प्रत्येकाला ठाऊक असते. एक नेता म्हणून फडणवीसांनी हे नियमितपणे केले. निवडणुकांच्या काळात ते ओव्हर टाईम करतात, असे म्हणायला वाव नाही. रोज किमान १८ तास काम करणे हा वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून खालपर्यंत झिरपलेला पॅटर्न आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते मेहनतीत मागे नाहीत, फडणवीस तर अजिबात नाहीत.

वॉर रुम संस्कृती भाजपाने पक्षात रुजवलेली आहे. फडणवीसांचा स्वत:चा वॉर रुम ते विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही कार्यरत होता. निवडणुकीच्या काळात त्रयस्थ कंपन्यांच्या माध्यमातून ते सर्व्हे घेतात. तळागाळातील जनता आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून कोणाकडे पाहते. कोणता उमेदवार लोकप्रिय आहे. हे सगळे भाजपाने सुरू केले. अन्य पक्षांनी ते नंतर स्वाकारले. इतरांसाठी हा निव्वळ उपचार आहे, भाजपाने ही आपली संस्कृती बनवलेली आहे. ही संस्कृती फडणवीसांच्या रक्तात भिनलेली आहे.

निवडणूक सुरू झाली की फडणवीस अगदी फ्रंटवर येऊन लढतात. मग निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची किंवा कॉर्पोरेशनची. निवडणुकांच्या काळात ते राज्यभरात फिरले. प्रत्येक विधानसभा मतदार संघात सभा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मेहनतीच्या बाबतीत त्यांच्याशी कोणी स्पर्धा करू शकत नाही. निवडणुकांच्या काळात महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅंडची चर्चा होती. फडणवीस हा एकमेव ब्रॅंड सध्या महाराष्ट्रात आहे, हे निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले. हा ब्रॅंड विकासाचा आहे, परिवर्तनाचा ब्रँड आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, शक्तीपीठ महामार्ग असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी प्रत्यक्षात आणले. महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन म्हणून जनता त्यांच्याकडे पाहाते. आम्ही उद्योगाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरात फिरत असतो, लोकांना भेटत असतो. त्यांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात झालेले परिवर्तन आम्हाला दिसते. यामुळे लोकांना होणारा लाभ दिसतो. निवडणुकीच्या काळात या कामाचे रुपांतर मतांमध्ये होते. ईव्हीएम अशीच हॅक होतात. पक्षाने जी जबाबदारी दिली, त्याला मी शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला, हे विधान फडणवीसांच्या तोंडून मी अनेकदा ऐकले आहे. हे शत प्रति शत सत्य आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी हे सिद्ध केले आहे.

महाराष्ट्राला आता केवळ भाषणं देणारा नेता नको, तर रिझल्ट देणारा ‘परफॉर्मर’ हवा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे सिद्ध केले आहे की राजकारण हे केवळ सत्तेचे खेळ नसून ते एक गंभीर ‘मॅनेजमेंट सायन्स’ आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक राजकीय चातुर्य यांचा हा दुर्मिळ संगम आहे. एक उद्योजक म्हणून मी नक्कीच सांगेन की, महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी अशाच ‘धुरंधर’ नेतृत्वाची राज्याला गरज आहे.

 

१. मुंबई (BMC) –

* भाजप: ८९ जागा (सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास)

* शिवसेना (शिंदे गट): २९ जागा

* महायुती एकूण: ११८ जागा (जादुई आकडा ११४ पार)

 

२. नागपूर (NMC) – हक्काचा गड अभेद्य:

आपल्या होमग्राऊंडवर पकड कशी असावी, हे फडणवीसांकडून शिकावे. नागपूरमध्ये त्यांनी सलग चौथ्यांदा सत्ता मिळवून अँटी-इन्कमबन्सी (Anti-incumbency) च्या चर्चा फोल ठरवल्या.

* एकूण जागा: १५१

* भाजप विजय: १०२ जागा

येथे भाजपचे वर्चस्व इतके निर्विवाद आहे की काँग्रेस वगळता विरोधकांना दुहेरी आकडा गाठणेही कठीण झाले.

३. पुणे (PMC) आणि पिंपरी-चिंचवड (PCMC) – आयटी सिटीची पसंती:

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे सुशिक्षित आणि नोकरदार वर्गाचे शहर. इथे पाट्याटाकऊ राजकारण चालत नाही.

* पुणे: भाजपने ११९ जागा जिंकत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आपले वर्चस्व सिद्ध केले.

* पिंपरी-चिंचवड: ८४ जागांसह भाजपने आपली सत्ता कायम राखली.

४. राज्याचे चित्र – ‘स्ट्राइक रेट’ची कमाल:

राज्यातील एकूण २९ पैकी २५ महानगरपालिकांवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. ठाणे, नवी मुंबई, सोलापूर, अमरावती आणि अकोला यांसारख्या शहरांमध्येही कमळ फुलले आहे. भाजपने राज्यभरात सुमारे १४०० पेक्षा अधिक जागा जिंकून आपणच महाराष्ट्राचे ‘नंबर १’ पक्ष असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

(लेखक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते)

Exit mobile version