छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खवडा टेकडीवर हृदयद्रावक घटना घडली आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने टेकडीच्या कड्यावर उभ्या असलेल्या १८ वर्षीय मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्याचे वडीलही दरीत कोसळले. त्यानंतर घाबरलेल्या आईनेही उडी घेतल्याने आई-वडील आणि मुलगा अशा तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली.
माहितीनुसार, देवळाई परिसरातील १८ वर्षीय तरुण सकाळी सुमारे १० वाजता खवडा टेकडीवर गेला आणि कड्यावर उभा राहून आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. त्यानंतर गावकरी, आई-वडील आणि घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. जवळपास तीन तास त्याला कड्यावरून मागे येण्यासाठी विनवणी करण्यात आली. भविष्यातील आयुष्याचा आणि आई-वडिलांचा विचार करण्याचे आवाहनही करण्यात आले. मात्र, तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण घटनास्थळी असलेल्या पर्यटक आणि स्थानिकांनी केले.
सुरुवातीला मुलाचे वडील खाली उभे राहून त्याला समजावत होते. मात्र, अखेरच्या १५ ते २० मिनिटांत ते स्वतः टेकडीवर चढून मुलाजवळ गेले. मुलगा सतत कड्याच्या दिशेने जात असल्याने वडिलांनी त्याला पकडून मागे ओढण्याचा प्रयत्न केला. दुपारी सुमारे १ वाजता मुलाला पकडण्याचा प्रयत्न करताना दोघांचाही तोल गेला आणि दोघेही टेकडीवरून खाली कोसळले. त्यानंतर काही क्षणांतच मुलाच्या आईनेही दरीत उडी मारली. या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.
हे ही वाचा:
एफडीधारकांसाठी मोठी बातमी! आता व्याजदराची माहिती रोज मिळणार
भारत-मॉरिशसदरम्यान ५ वर्षांचा मोठा इंधन करार
ब्रिटन-युरोपच्या गुंतवणुकीला भारताचा ‘ग्रीन चॅनेल’
अभ्यास न केल्याने शिक्षिकेने थप्पड मारली; ६ वर्षांचा मुलगा तिथेच गतप्राण
घटना घडण्यापूर्वी पोलिस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनीही तरुणाला कड्यावरून सुरक्षित ठिकाणी येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांचे प्रयत्नही निष्फळ ठरले. प्रत्यक्षदर्शी संजय जाधव यांनी सांगितले की, आई-वडील आणि गावकऱ्यांनी तरुणाला समजावण्यासाठी खूप प्रयत्न केले. आई त्याला कड्यावरून खाली येण्याची वारंवार विनंती करत होती. मात्र, तो कड्यावरून हटण्यास तयार नव्हता.
