डोक्यावरील केस कापले, गोमुत्र प्यायला दिले… विनायक राऊतांच्या सुनेची तक्रार

नगरसेवक गितेश राऊतसह सात जणांवर गुन्हा

डोक्यावरील केस कापले, गोमुत्र प्यायला दिले… विनायक राऊतांच्या सुनेची तक्रार

ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, यांचा मुलगा मुंबई महापालिकेतील नगरसेवक गितेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्य, अशा एकूण सात जणांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने तिच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोपही गिरीजा यांनी तक्रारीत केला आहे. या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणात राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत वैवाहिक आयुष्य, मानसिक छळ आणि कुटुंबीयांच्या वागणुकीबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी विनायक राऊत आमच्या घरी यायचे

गिरीजा राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत तिच्यासोबत घडलेली सगळी आपबिती सांगितली. “विनायक राऊत हे कधीच आमच्यासोबत राहत नव्हते. आम्ही मुंबईत चाळीतल्या घरी राहायचो. विनायक राऊत दुसऱ्या पत्नीसोबत दुसऱ्या घरात राहतात. विनायक राऊतांनी दुसरं लग्न आणि दुसरं घर माझ्यापासून लपवलं, विनायक राऊत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आमच्या घरी यायचे. त्याव्यतिरिक्त मुंबईत आमच्या घरी कधीही यायचे नाही. फोन करुन मला तू ही जबाबदारी घेतली पाहिजे, तू हे केलं पाहिजे, असं सांगायचे”, अशी माहिती गिरीजा राऊत यांनी दिली.

७ वर्षं छळ केला

“विनायक राऊतांची राजकीय पार्श्वभुमी स्ट्राँग असल्यामुळे मी आधी तक्रार केली नाही. विनायक राऊतांनी कुटुंबप्रमुखाची जबाबदारी घेत कधीच त्यांच्या पत्नी मुलाला समजावलं नाही. अघोरी कृत्य करणारे सगळे बाबा सिंधुदुर्गाच्या आसपासचे आहेत. कधीतरी परिस्थिती सुधारेल असं वाटलं होतं. ७ वर्षं छळ केला, माझे केस ओढत मला त्रास दिला. खोटं बोलून ७ वर्ष माझ्या कुटुंबाचा घात केलाय. लैंगिक संबंध ठेवण्यासाठी गितेश सक्षम नाही, त्यामुळे तो आणि त्याची आई माझ्यासोबत अत्यंत वाईट वागले. माझे वागणे, कपडे घालणे सगळ्यांवर बंधनं होती. त्याची आई जशी आहे तसे मला वागायला लावले. गितेश राऊत हा घरात वेगळा वागतो आणि बाहेर वेगळा वागतो. आईला, मला घाण शिव्या देतो, बाहेर कुणाला सांगूनही पटणार नाही की ही व्यक्ती अशी आहे”, असं गिरीजा राऊत म्हणाल्या.

हे ही वाचा:

बुलेट ट्रेनच्या तीन नवीन मार्गांची घोषणा

विम्बल्डनची नवी राणी नोस्कोव्हाला आली आईची आठवण!

‘ताज’ हॉटेलला बॉम्बची धमकी; मध्यरात्री सुरक्षा यंत्रणांची धावपळ

सूरांचा अमर स्वर हरपला; दिग्गज गायिका एस. जानकी यांचे निधन

गिरीजा राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, “सासू शामल राऊत या पती समोर नसताना वेगवेगळ्या प्रकारे वागत असत. सतत टोमणे मारणे, माहेरच्या लोकांचा अपमान करणे आणि पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच पती गितेश राऊत माझ्या मासिक पाळीच्या तारखांची नोंद मोबाईलमध्ये ठेवत होता. विनायक राऊत यांच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास माझ्यावर दबाव टाकला जात होता”, असा आरोपही त्यांनी केला आहे.

“लग्नानंतर उटी येथे सहलीला गेल्यानंतर सहा दिवस पतीने कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. याबाबत विचारणा केल्यावर मानसिक जुळवून घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगत विषय टाळला. पुढे मंदिरात दर्शनासाठी गेले असताना लोकांसमोर अपमानास्पद भाषा वापरून माझा अवमान करण्यात आला. पती सार्वजनिक ठिकाणीही वेळ, परिस्थिती किंवा माझ्या भावनांचा विचार न करता वारंवार वाद घालत” असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

गिरीजा राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, “पतीचे मत असे होते की, शारीरिक संबंध फक्त परदेशातील ठिकाणीच ठेवता येतात, भारतात त्याला ते सोयीचे वाटत नव्हते. घरी जवळीक साधण्याचीही तो विविध कारणे देत टाळत असे. या सततच्या वागणुकीमुळे मानसिक त्रास वाढला आणि दोघांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारही घेतले. मात्र पती कोणत्याही उपचारांना सहकार्य करत नव्हता. त्यानंतर लैंगिक आरोग्य तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात आला. नैसर्गिक गर्भधारणेसह विविध पर्याय डॉक्टरांनी सांगूनही पतीने फक्त आयव्हीएफ प्रक्रियेवर आग्रह धरत घरच्या घरी संबंधित प्रक्रिया करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला, विरोध केल्यास शिवीगाळ आणि दमदाटी केली”, असा आरोप त्यांनी केला आहे.

तक्रारीनुसार, या सर्व घडामोडींची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली होती. मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी वैद्यकीय सल्ल्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही गिरीजा राऊत यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप हे तक्रारदाराने केलेले असून त्यांची सत्यता न्यायालयीन आणि पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे – विनायक राऊत

मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाहीत. 2018 मध्ये घटना घडली असे सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यातंच काही काळं आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली. या नोटिसमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे. याशिवाय 10 कोटींची अधिक रक्कम द्यावी. मानसिक नुकसान भरपाई 2 कोटी द्यावी, अशी मागणी गिरीजा राऊत यांनी केली आहे. 5 रूमचं घर आणि ऑटोमॅटीक गाडी मागितली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत, म्हटल्यावर तिने तक्रार केली, असा दावा विनायक राऊतांनी केला. आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आई-वडील समोर असताना तेव्हा तक्रार केली नाही. या संदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असं विनायक राऊत म्हणाले.

Exit mobile version