शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पहिल्याच टप्प्यात ₹५,०२८ कोटींचे वितरण

टप्प्याटप्प्याने उर्वरित लाभार्थ्यांनाही मिळणार फायदा

शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पहिल्याच टप्प्यात ₹५,०२८ कोटींचे वितरण

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये तब्बल ५ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम वर्ग करण्यात आली असून, त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांची आणि कर्जाची माहिती पडताळल्यानंतर प्रत्यक्ष निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये जवळपास ५ हजार २८ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित कर्जखात्यात जमा होत असल्याने प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
नाक खुपसू नका! ‘एफसीआरए’ भारताचा अंतर्गत विषय!!

प्रज्ञानानंदचा ‘चेकमेट’!

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजयला मोठा दिलासा

झारखंड आंदोलनात गेलेल्या नेहा बोराला मंचावरून उतरवले, शाई फेकली

कर्जाच्या ओझ्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः नवीन हंगामासाठी बियाणे, खते, औषधे आणि इतर शेतीविषयक खर्चासाठी भांडवलाची गरज असताना जुन्या कर्जाचा भार कमी झाल्यास शेतकऱ्यांना नव्याने आर्थिक नियोजन करता येणार आहे. कर्जमाफीमुळे पात्र शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्जव्यवस्थेत सहभागी होण्याचा मार्गही सुकर होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांच्या माहितीची छाननी आणि पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही पुढील प्रक्रियेत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एकाच वेळी पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम कर्जखात्यांमध्ये वर्ग झाल्याने राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफी योजनेने आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.

Exit mobile version