सावजी खाद्यसंस्कृतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या वादावर अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अखेर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी, “मी कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू ठेवून बोललो नव्हतो. मी सावजी खाद्यसंस्कृतीचा अपमान केलेला नाही आणि त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” अशी ठाम भूमिका मांडली.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे यांनी, “माझ्यासारख्या व्यक्तीने सावजी जेवण खाल्ले तर किमान महिनाभर हॉस्पिटलमध्ये जावे लागेल,” असे विधान केले होते. हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यानंतर विदर्भासह राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सावजी हॉटेल व्यावसायिक, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या वक्तव्याचा निषेध करत, ही विदर्भाच्या पारंपरिक आणि लोकप्रिय खाद्यसंस्कृतीचा अपमान असल्याचा आरोप केला.
हे ही वाचा:
सुनेत्रा पवार प्रकरणावरून धनंजय मुंडेंना सुनील तटकरेंचा इशारा
अनधिकृत स्पर्धांवर पीसीबीचा चाप
लंडन गोल्फ चॅम्पियनशिपमध्ये दीक्षा डागरवर भारताच्या आशा
श्रीलंकेत टीम इंडियाची दमदार एंट्री; १५ ऑगस्टपासून कसोटी रणसंग्राम
या वादावर प्रथमच स्पष्ट प्रतिक्रिया देताना मुंढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रकृती आणि आहाराच्या सवयी वेगळ्या असतात. आपण नियमितपणे साधा आणि कमी तेलकट आहार घेत असल्याने अतितिखट किंवा जास्त मसालेदार अन्न आपल्या शरीराला मानवणार नाही, एवढाच आपल्या वक्तव्याचा अर्थ होता. त्याचा संबंध सावजी खाद्यसंस्कृतीच्या गुणवत्तेशी किंवा परंपरेशी जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपले मत हे पूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आधारित असल्याचे सांगत त्यांनी कोणत्याही समाजाची किंवा खाद्यसंस्कृतीची अवहेलना करण्याचा हेतू नसल्याचे पुन्हा अधोरेखित केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे सावजी खाद्यसंस्कृतीबाबत मोठी चर्चा रंगली आहे. अनेकांनी सावजी जेवण ही विदर्भाची सांस्कृतिक ओळख असल्याचे सांगत त्याचा सन्मान राखण्याची मागणी केली आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनीही सावजी पाककला ही केवळ तिखटपणासाठी नव्हे, तर तिच्या वैशिष्ट्यपूर्ण मसाल्यांसाठी आणि पारंपरिक चवीसाठी ओळखली जाते, असे सांगत या वादावर आपले मत व्यक्त केले. आहारतज्ज्ञांनीदेखील तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे प्रमाणात सेवन केल्यास ते आहाराचा भाग असू शकतात, असे मत नोंदवले आहे.
तुकाराम मुंढे यांनी मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम राहत, “माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. मी कोणाचीही माफी मागणार नाही, कारण मी चुकीचे काही बोललेलो नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे सावजी वाद आणखी तापण्याची शक्यता असून, या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरावरही चर्चा सुरूच आहे.
