पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आसाममध्ये १८,५३० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करणार आहेत. आसाम दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी दरांग येथे पोहोचतील, जिथे ते सार्वजनिक सभेला संबोधित करतील आणि अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. यामध्ये दरांग मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय, जीएनएम शाळा आणि बीएससी नर्सिंग कॉलेज तसेच गुवाहाटी रिंग रोड प्रकल्पाचा समावेश आहे. राजधानी परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करणे व गतिशीलता वाढवणे हा या शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा उद्देश आहे.
ते ब्रह्मपुत्र नदीवरील कुरुवा-नरेंगी पुलाचीही पायाभरणी करतील. या पुलामुळे प्रादेशिक संपर्कामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होऊन सामाजिक-आर्थिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. यानंतर पंतप्रधान मोदी गोलाघाट जिल्ह्यातील नुमालीगढला भेट देतील. तिथे ते नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड (NRL) मधील आसाम बायो-इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करतील. हा प्रकल्प भारताच्या स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा दिशेने केलेल्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग आहे. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा..
डीआरआयकडून २६ कोटींचे अमली पदार्थ जप्त
पुण्यात दर्ग्याच्या खाली सापडले भुयार
नाक फक्त श्वसनाचा मार्ग नाही, तर शरीराचा सिक्युरिटी गार्ड
औषधी गुणधर्मांसाठीही फायद्याची आहे भांगेची गोळी!
याशिवाय, त्याच रिफायनरीमध्ये पॉलीप्रोपायलीन प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान करतील. हा प्रकल्प आसामच्या वाढत्या पेट्रोकेमिकल क्षेत्रातील मोठा गुंतवणूक उपक्रम असून त्यातून रोजगार निर्मितीबरोबरच औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. यापूर्वी, शनिवारी गुवाहाटीत पंतप्रधान मोदी एका सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांची १०० वी जयंती साजरी करण्यात आली. आसामी संगीत, साहित्य आणि ओळख घडवण्यात त्यांच्या बहुमोल योगदानाला अभिवादन करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आसाम दौऱ्यानंतर पंतप्रधान १५ सप्टेंबर रोजी पश्चिम बंगाल आणि बिहारचा दौरा करतील. कोलकात्यात ते १६व्या संयुक्त कमांडर परिषदेला प्रारंभ करतील. त्यानंतर बिहारमधील पूर्णिया येथे नवीन विमानतळ टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. यासोबतच ३६,००० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांना सुरुवात होईल. त्याचबरोबर, ते राष्ट्रीय मखाना मंडळाचेही उद्घाटन करतील. या मंडळामुळे स्थानिक शेती व निर्यात क्षमतेला चालना मिळणार आहे.
