श्रेयस अय्यर याची विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ साठी मुंबई संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुखापतीमुळे ऑलराउंडर शार्दुल ठाकूर स्पर्धेतून बाहेर पडल्याने त्याच्या जागी अय्यरकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफी मध्ये मुंबई संघाची धुरा शार्दुल ठाकूरकडे होती. मात्र, काफ इंजरीमुळे तो उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ने श्रेयस अय्यरला उर्वरित लीग सामन्यांसाठी कर्णधार म्हणून घोषित केले.
ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना झेल पकडताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही काळ क्रिकेटपासून दूर होता. दरम्यान, ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असून, तो फिटनेस चाचणीत यशस्वी ठरल्यास संघात खेळू शकतो.
वनडे संघाची घोषणा करताना भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने स्पष्ट केले होते की अय्यरच्या फिटनेसचे मूल्यांकन सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये केले जाईल. अहवालांनुसार, अय्यर लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे.
जर अय्यरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हिरवा कंदील मिळाला, तर विजय हजारे ट्रॉफीच्या नॉकआऊट फेरीसाठी मुंबईला नव्या कर्णधाराची नियुक्ती करावी लागू शकते. सध्या उर्वरित दोन लीग सामन्यांत श्रेयस अय्यरच मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे.
मुंबई संघाने आतापर्यंत ५ पैकी ४ सामने जिंकत ग्रुप ‘सी’ मध्ये गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. मुंबईचे पुढील सामने ६ जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशविरुद्ध आणि ८ जानेवारी रोजी पंजाबविरुद्ध होणार असून, हे दोन्ही सामने जयपूर येथे खेळवले जाणार आहेत.
