“ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याने मुंबईतील समीकरणं बदलणार नाहीत”

शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांची उबाठावर टीका

“ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याने मुंबईतील समीकरणं बदलणार नाहीत”

सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणारे आणि वारंवार भूमिका बदलणारे ठाकरे बंधु एकत्र आले तरी मुंबईच्या निवडणुकीत फारसा फरक पडणार नाही हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून दिसून आले, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. आज ( २२ ऑगस्ट) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाकरे बंधु एकत्र आल्याने मुंबईचे राजकारण बदलेल असे केले जाणारे दावे या निकालाने फोल ठरले, असा टोला निरुपम यांनी यावेळी लगावला. मराठी माणसांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदे यांना स्थान आहे, असे ते म्हणाले.

निरुपम पुढे म्हणाले की, बेस्ट पतपेढी निवडणुकीपूर्वी मुंबईत उबाठा आणि मनसेची युती करण्यात आली होती. मराठी मतांसाठी त्यांनी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण केला, असा आरोप निरुपम यांनी केला. ठाकरे बंधु एकत्र आल्याने मुंबईचे राजकारण बदलेल. तसेच ठाकरे ब्रॅंडबाबत विजयाचे दावे केले जात होते, मात्र हे दावे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत फोल ठरले. पतपेढीच्या निवडणुकीत २१ जागांपैकी एकही जागा ठाकरे बंधुंना जिंकता आले नाही. या निवडणुकीत ८३ टक्के मतदान झाले. बेस्टच्या १२ हजार मतदारांनी ठाकरे बंधुंना नाकारले, असे निरुपम म्हणाले.

मुंबईत एकच ब्रॅंड तो म्हणजे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आहेत, असे निरुपम म्हणाले. मुंबईतील मराठी माणसांच्या मनात बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्थान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे आहेत, असे निरुपम म्हणाले.

हे ही वाचा : 

“डी.के. शिवकुमार कर्नाटकाचे मोठे कलाकार, त्यांना गंभीरपणे घेऊ नका”

“छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांची अमानुष क्रूरता: तिरंगा फडकवल्याबद्दल तरुणाची हत्या!”

चिकन नेक भागात बांगलादेशी प्रभाव वाढतोय, सुरक्षेसाठी मोठा धोका!

“पंतप्रधान मोदी बिहारला आले की महाआघाडीचे नेते थरथर कापतात”

मुंबई सर्वांना सामावून घेणारं शहर आहे. या शहरात भाषिक वाद करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना स्पष्टपणे नाकारले जाईल, असे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून संदेश मिळाला आहे. मुंबईत उबाठाचे आमदार आणि खासदार हे मुस्लिम मतांवर निवडून आले. त्यांच्यापासून मराठी मतदार दुरावला आहे, असे ते म्हणाले.

Exit mobile version