गेट वे ऑफ इंडियाजवळ नौदलाची बोट धडकून प्रवासी बोट उलटली, १३ मृत्युमुखी

बोटीतून साधारण १०० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते

गेट वे ऑफ इंडियाजवळ नौदलाची बोट धडकून प्रवासी बोट उलटली, १३ मृत्युमुखी

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एक प्रवासी बोट उलटून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून १०१ लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. मृतांमध्ये ३ जण नौदल कर्मचारी असून १० नागरिकांचा समावेश आहे. दोन गंभीर जखमींना नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्यापही शोधकार्य सुरु असून याची संपूर्ण माहिती उद्यापर्यंत समोर येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान नौदलानेही याबाबत निवेदन जाहीर केले आहे आणि या घटनेचा तपशील दिला आहे. शिवाय, ही दुर्घटना घडल्यावर नौदलाच्या बोटी, मरीन पोलिसांच्या बोटी तात्काळ मदतीसाठी धावून गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इंजिनची चाचणी घेणारी स्पीड बोट धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘नीलकमल’ नावाची प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटा गुफा येथे जात होती. यावेळी काही अंतरावर जाताच एका स्पीड बोटीने या प्रवासी बोटीला धडक दिली. ही बोट नेव्हीची होती. यानंतर काही वेळातच बोटीत पाणी शिरू लागले आणि बोट समुद्रात पलटी झाली. प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आले होते. 

 ‘नीलकमल’ बोट उरण, कारंजा येथे बुडाली. या बोटीची क्षमता १३० होती आणि त्यावेळी बोटीत साधारण ८० जण होते, अशी माहिती बोटीच्या मालकाने दिली आहे. दरम्यान, घटनास्थळी नौदल, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलीस ठाण्याच्या तीन आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत आणि बचावकार्य चालू आहे.

हे ही वाचा..

उद्धव ठाकरे फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हणतात आणि त्यांना भेटायलाही येतात, याची कीव येते!

भोजनालयात धूम्रपान : मलेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना दंड

सर्व धार्मिक स्थळे सरकारच्या नियंत्रणाखाली आणा! विशिष्ट धर्माचीच का?

कुर्ला बस अपघात प्रकरण, बेस्ट कंत्राटदाराला ठोठावणार ४ लाखांचा दंड!

गेट वे ऑफ इंडियाजवळून ही बोट दुपारी ३.३० च्या सुमारास एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. साधारण ४.१५ वाजण्याच्या सुमारास धडक बसून ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मृतकांच्या कुटुंबाना ५ लाख रुपये देण्यात येईल. शासन आणि नौदलाच्या वतीने या घटनेची चौकशी करण्यात येईल. 

ते पुढे म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार, नीलकमल बोट आपल्या दिशेने व्यवस्थित जात होती. नौदलाची जी बोट आहे, त्याला नवीन इंजिन लावण्यात आले होते आणि त्याची टेस्ट घेत होते. ८ या आकड्या सारखी याची टेस्ट घ्यावी लागते, तशी टेस्ट चालू होती. नौदलाचे मत असे आहे की, टेस्ट दरम्यान इंजिनच्या थ्रोटलचा प्रोब्लेम झाला आणि त्याच्यामुळे नौदलाचा बोटीवरील ताबा सुटला आणि नीलकमल बोटीला आदळली, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दुर्घटनेतील मयत व्यक्ती –
१) महेंद्रसिंग शेखावत ( नेव्ही)
२) प्रवीण शर्मा (NAD बोट वरील कामगार)
३) मंगेश(NAD बोट वरील कामगार)
४) मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट)
५) राकेश नानाजी अहिरे( प्रवासी बोट)
६) साफियाना पठाण मयत महिला
७) माही पावरा मयत मुलगी वय-३ तीन
८) अक्षता राकेश अहिरे
९) अनोळखी मयत महिला
१०) अनोळखी मयत महिला
११) मिथु राकेश अहिरे वय- ८ वर्षे
१२) दिपक व्ही.
१३) अनोळखी पुरुष

७ पुरुष, ४ महिला , २ बालक असे १३ मृत

Exit mobile version