बॉलिवूडमधील एकमेव सोलो महिला संगीतकाराची कहाणी…

बॉलिवूडमधील एकमेव सोलो महिला संगीतकाराची कहाणी…

हिंदी चित्रपटसृष्टीत जेव्हा महिला संगीतकारांचा उल्लेख केला जातो, तेव्हा उषा खन्ना हे नाव नक्कीच आदराने घेतले जाते. त्या अशा काळात उभ्या राहिल्या, जेव्हा संगीताची दुनिया पुरुषप्रधान मानली जात होती. पण आपल्या मेहनत, चिकाटी आणि विलक्षण प्रतिभेच्या बळावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्या हिंदी सिनेमातील एकमेव स्वतंत्र महिला संगीतकार ठरल्या ज्यांनी इतका दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा प्रवास केला. उषा खन्ना यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९४१ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. ग्वाल्हेर हे संगीताच्या समृद्ध परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. तानसेनसारख्या महान संगीतकारांची परंपरा तिथे आजही जिवंत आहे. अशा वातावरणात जन्मलेल्या उषांना बालपणापासूनच संगीताचे संस्कार लाभले. त्यांच्या वडिलांचे नाव मनोहर खन्ना होते, जे गझलकार होते आणि चित्रपटांसाठी गझल लिहायचे. त्यामुळे उषांच्या घरात लहानपणापासूनच संगीताचे सूर गुंजत होते. वडिलांच्या कामानिमित्त कुटुंब मुंबईत आले आणि तिथे उषांनी जद्दनबाई आणि सरस्वती देवी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले.

उषा खन्ना यांनी कारकिर्दीची सुरुवात गायिका म्हणून केली, पण लवकरच त्यांचा कल संगीत रचनाकडे वळला. त्या काळात, जेव्हा चित्रपटसृष्टीत शंकर-जयकिशन, सी. रामचंद्र, नौशाद, एस. डी. बर्मन यांसारख्या पुरुष संगीतकारांचे वर्चस्व होते, तेव्हा एका महिलेला संगीत दिग्दर्शक म्हणून स्थान मिळवणे जवळजवळ अशक्य होते. पण उषांनी हार मानली नाही. त्यांनी प्रसिद्ध निर्माता सशधर मुखर्जी यांच्याकडे आपली कला सादर केली. सुरुवातीला मुखर्जी यांनी त्यांना गायिका म्हणून संधी दिली, पण जेव्हा उषांनी स्वतः तयार केलेल्या धून सादर केल्या, तेव्हा मुखर्जी प्रभावित झाले आणि त्यांनी १९५९ च्या सुपरहिट चित्रपट ‘दिल देकर देखो’ साठी उषा खन्ना यांना संगीत दिग्दर्शनाची संधी दिली.

हेही वाचा..

बंगालमधील पूरग्रस्तांना भेट देत असताना भाजपा खासदारावर हल्ला!

भारत जागतिक दूरसंचार केंद्र म्हणून उदयास येणार

नौदलात सामील झाले आयएनएस अँड्रॉथ

सोनम वांगचुक अटक प्रकरणात दिलासा नाही; सुनावणी पुढे ढकलली!

हीच फिल्म त्यांच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरली. त्या काळातील लोकप्रिय अभिनेता शम्मी कपूर यांनाही त्यांच्या धून आवडल्या. सामान्यतः ते मोठ्या संगीतकारांसोबतच काम करत, पण त्यांनी उषांच्या संगीताला मान्यता दिली. या चित्रपटानंतर उषा खन्ना यांनी आपल्या गोड, जोशपूर्ण आणि भावपूर्ण संगीताने सर्वांना मोहवून टाकले. त्यांनी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आणि किशोर कुमार यांसारख्या महान गायकांसोबत काम केले आणि अनेक अजरामर गाणी दिली. त्यांच्या सुप्रसिद्ध रचनांमध्ये, ‘छोड़ो कल की बातें कल की बात पुरानी’ (हम हिंदुस्तानी), ‘मधुबन खुशबू देता है’ (साजन बिना सुहागन), ‘चाय पे बुलाया है’ (सौतन), ‘तेरी गलियों में रखेंगे कदम’ (हवस), ‘दिल के टुकड़े-टुकड़े’ (दादा) यांचा समावेश होतो. ही गाणी आजही लोकांच्या मनात ताजी आहेत.

उषा खन्ना यांची खासियत म्हणजे बहुप्रकारच्या गाण्यांवर त्यांची पकड. रोमँटिक गीत असो, विरहगीत असो, किंवा चुलबुला लोकसंगीत प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली वेगळी छाप सोडली. चित्रपटसृष्टीतील प्रवास मात्र सोपा नव्हता. महिला संगीतकार म्हणून त्यांना अनेकदा अन्याय व दुर्लक्ष सहन करावे लागले. मोठ्या बजेटच्या चित्रपटांसाठी प्रामुख्याने पुरुष संगीतकारांचीच निवड होत असे. तरीही उषांनी लहान आणि मध्यम बजेटच्या चित्रपटांसाठी संगीत देत राहिल्या आणि अनेकदा त्या चित्रपटांचे संगीत इतके गाजले की फिल्म ओळखली गेली नसली तरी तिची गाणी अमर ठरली.

त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक वेळा पुरस्कार आणि नामांकनं मिळाली. त्यांच्या संगीत प्रवासाने जवळजवळ सहा दशके व्यापली. ही कामगिरी हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणत्याही महिला संगीतकारासाठी अभूतपूर्व मानली जाते. उषा खन्ना यांनी आपल्या स्वप्नांच्या जिद्दीने आणि संगीतप्रेमाने भारतीय चित्रपटसंगीतात एक अनोखा ठसा उमटवला. जो आजही प्रेरणादायी आहे.

Exit mobile version