मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच घाटकोपरच्या अशोक नगर परिसरात बुधवार, १२ ऑगस्ट रोजी पहाटे भीषण दुर्घटना घडली. घाटकोपर येथील गौसिया चाळ परिसरातील डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळून दोन ते तीन घरांवर दरड आली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी पहाटे साधारण ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. डोंगराचा मोठा भाग थेट चाळीतील घरांवर कोसळल्याने काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.
स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, बचावकार्य सुरू असताना परिस्थितीचा नेमका आढावा घेतला जात आहे. बचाव पथकांकडून ढिगारा काळजीपूर्वक हटवून नागरिकांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी जाणाऱ्या रस्त्यांपैकी काही मार्ग अरुंद असल्याने बचाव यंत्रणांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे यंत्रसामग्री पोहोचवण्यास मर्यादा येत असून, उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनांच्या मदतीने बचावकार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
इंदिरा कँटीनच्या स्वयंपाकघरासह गोदामात अस्वच्छता; गोदाम सील, नमुने तपासणीला
राहुल गांधींच्या त्या विदेश दौऱ्यात कोण होते सोबत ? फोटो केला व्हायरल
चित्रपट चालो न चालो, पॉपकॉर्नची कमाई मात्र जोरात
नेताजींच्या नातवाची ‘आझाद हिंद’च्या झेंड्याखाली नवी राजकीय वाटचाल?
घाटकोपर, साकीनाका आणि चिराग नगर परिसरात गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढला होता. या पार्श्वभूमीवर डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण आणि डोंगराचा भाग किती प्रमाणात खचला, याबाबत प्रशासनाकडून पुढील तपास केला जाणार आहे.
