चिनाब ब्रिजवर वंदे भारत सुसाट; गाठला १०० किमी प्रतितासाचा वेग!

जम्मू-काश्मीरच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी ऐतिहासिक घडामोड

चिनाब ब्रिजवर वंदे भारत सुसाट; गाठला १०० किमी प्रतितासाचा वेग!

जम्मू-काश्मीरच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने मोठी आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब ब्रिजवरून वंदे भारत ट्रेनने पहिल्यांदाच जवळपास १०० किमी प्रतितास वेगाने धाव घेतली. कटरा-बनिहाल रेल्वे मार्गावरील कमाल अनुमत वेग वाढवण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर हा वेग साध्य करण्यात आला आहे.

उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागातील श्री माता वैष्णोदेवी कटरा ते बनिहालदरम्यानचा १११ किलोमीटर लांबीचा नवा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आता १०० किमी प्रतितासाच्या कमाल वेगासाठी खुला झाला आहे. यापूर्वी या मार्गाच्या वेगवेगळ्या भागांवर कमी वेगमर्यादा लागू होती. कटरा-संगलदान मार्गावर ८५ किमी प्रतितास, तर संगलदान-बनिहाल मार्गावर ७५ किमी प्रतितास इतकी कमाल अनुमत वेगमर्यादा होती. आता दोन्ही सेक्शनसाठी कमाल वेग १०० किमी प्रतितास करण्यात आला आहे. हा वेगवाढीचा निर्णय निर्धारित सर्व सुरक्षा अटींची पूर्तता केल्यानंतर मंजूर करण्यात आल्याचे उत्तर रेल्वेने स्पष्ट केले आहे.

या संपूर्ण घडामोडीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर वंदे भारतने जवळपास १०० किमी प्रतितास वेग गाठला. कठीण डोंगराळ भूप्रदेशातून जाणाऱ्या या रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

हे ही वाचा:

कॅन्सर mRNA थेरपी ठरली गेमचेंजर! मॉडर्नाच्या शेअर्समध्ये १७७ टक्क्यांची झेप

दारू घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी कोषाध्यक्षांच्या घरावर ईडीची धाड

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून निवृत्त आयकर अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा

डुप्लिकेट चावीने महागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चिनाब ब्रिज हा जम्मू-काश्मीर रेल्वे प्रकल्पातील प्रमुख अभियांत्रिकी टप्प्यांपैकी एक आहे. त्यामुळे या पुलावरून आधुनिक वंदे भारत ट्रेनने उच्च वेगाने धाव घेणे हे केवळ वेगवाढीचे नव्हे, तर दुर्गम पर्वतीय भागात आधुनिक रेल्वे तंत्रज्ञानाच्या क्षमतेचे प्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे. वेगमर्यादा वाढल्यामुळे कटरा ते बनिहालदरम्यानचा प्रवास आणखी कमी वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जम्मू-काश्मीरमधील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होऊन प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा फायदा मिळेल, असे उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Exit mobile version