भारतातील विमान कंपनी ‘इंडिगो’मुळे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा विस्कळीत झाली आहे. एक हजाराहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अशातच प्रवाशांच्या गैरसोयीचा फायदा इतर विमान कंपन्यांकडून घेतला जात आहे. उड्डाणे रद्द झाल्यानंतर, प्रवाशांना नवीन उड्डाणे बुक करण्यासाठी दहापट जास्त पैसे मोजावे लागत आहेत. प्रवाशांची गरज ओळखून इतर विमान कंपन्यांकडून जास्त भाडे घेतले जात असल्याचे लक्षात आले आहे. यानंतर आता केंद्र सरकारने विमान कंपन्यांना कठोर इशारा दिलेला आहे.
सध्याच्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत विमान प्रवासाच्या तिकीटीचे जास्त पैसे घेतले जात आहेत. यानंतर आता केंद्राने सर्व विमान कंपन्यांना निर्धारित भाडे मर्यादांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना या संकटातून वाचवण्याच्या उद्देशाने, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आपल्या आदेशात असा इशारा दिला आहे की, निर्धारित निकषांपेक्षा भाडे पातळीत कोणतीही वाढ झाल्यास त्वरित कारवाई केली जाईल.
“सध्या सुरू असलेल्या व्यत्ययादरम्यान काही विमान कंपन्यांकडून असामान्यपणे जास्त विमानभाडे आकारल्या जात असल्याच्या चिंतेची नागरी उड्डाण मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. सर्व विमान कंपन्यांना आता निर्धारित केलेल्या भाडे मर्यादांचे काटेकोरपणे पालन करण्याचे अधिकृत निर्देश जारी करण्यात आले आहेत,” असे निर्देशात म्हटले आहे. परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत किंमतींची मर्यादा लागू राहील, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
मुंबई- दिल्ली विमानाचे भाडे साधारण ५०,००० रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. साधारणपणे, या मार्गावरील विमान भाडे ६,००० ते ७,००० रुपये असते. अशीच परिस्थिती इतर मार्गांवर देखील असून यामुळे प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत.
हेही वाचा..
मालमत्ता गोठवल्या, कंपन्यांवर घातली बंदी; खलिस्तानी गटांविरुद्ध ब्रिटनची कारवाई
“पाक लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना अटक करा!”
पाकिस्तान- अफगाणिस्तान संघर्ष पुन्हा पेटला; सीमा भागात गोळीबार
“२०२६ मध्ये ममता बॅनर्जींना माजी मुख्यमंत्री म्हटले जाईल”
गेल्या काही दिवसांत, भारतातील सर्वात मोठी बजेट वाहक इंडिगोची एक हजाराहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली कारण नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांच्या पार्श्वभूमीवर क्रू रोस्टरमध्ये बदल करण्यात त्यांना अडचण येत होती. प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली ती म्हणजे विमान तिकिटांच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ, काही मार्गांच्या भाड्यात चार पटीने वाढ झाली.







