अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या तात्पुरत्या संघर्षविरामामुळे भारतीय शेअर बाजारात आज जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. बुधवारी (८ एप्रिल २०२६) सेन्सेक्स तब्बल २,९४६ अंकांनी उसळत ७७,५६० च्या पुढे बंद झाला, तर निफ्टीनेही ८७० हून अधिक अंकांची झेप घेत २३,९९७ या पातळीवर क्लोजिंग दिली, म्हणजेच २४,००० च्या अगदी जवळ पोहोचला.
या तेजीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे मध्यपूर्वेतील तणावात आलेली घट. अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांचा संघर्षविराम जाहीर झाल्यानंतर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. याचा थेट फायदा भारतीय बाजाराला झाला आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात मतदारयादीतून ५० लाख नावे हटवली जाणार!
अमेरिका-इराण संघर्षात तात्पुरता संघर्षविराम; भारताने दिला शांततेचा संदेश
भारताने केनियाला दिल्या १०० रायफल्स आणि ५० हजार गोळ्या
समरजित घाटगेनी ‘तुतारी’ खाली ठेवून ‘कमळ’ घेतले हाती!
आजच्या सत्रात जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली. विशेषतः ऑटो, बँकिंग, फायनान्स आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली जोरदार खरेदी ही बाजारातील मुख्य आकर्षण ठरली. तसेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही सुमारे ४ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली, जे व्यापक बाजारातील सकारात्मकता दर्शवते.
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण हा आणखी एक महत्त्वाचा घटक ठरला. तेलाच्या किमती १०० डॉलरच्या खाली आल्यामुळे भारतासारख्या आयातदार देशांसाठी हा मोठा दिलासा मानला जातो. त्यामुळे महागाईचा दबाव कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला आधार मिळेल, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली.
याशिवाय, जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, घसरलेले बाँड यिल्ड्स आणि रुपयातील मजबुती यामुळेही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. परिणामी, बाजारात सर्वत्र खरेदीचा जोर दिसून आला. तज्ज्ञांच्या मते, ही तेजी सध्या ‘रिलीफ रॅली’ स्वरूपाची आहे. म्हणजेच, भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे निर्माण झालेला हा तात्पुरता उत्साह आहे. पुढील काळात मध्यपूर्वेतील परिस्थिती कशी बदलते, तसेच आरबीआयचे धोरण आणि जागतिक आर्थिक संकेत काय राहतात, यावर बाजाराची दिशा अवलंबून असेल.
एकंदरीत, आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी अत्यंत सकारात्मक ठरला असून बाजाराने मोठी झेप घेत आत्मविश्वास परत मिळवला आहे. मात्र, तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला आहे.







