दक्षिण मुंबईतील उच्चभ्रूची सोसायटी म्हणून ओळख असलेल्या ‘वन अविघ्न पार्क’ सोसायटीच्या आवारात असलेल्या जैन मंदिरातील मूर्तीवरील जवळपास पावणे दोन कोटींचे दागिने चोरणाऱ्या माजी सुरक्षा रक्षकाला मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.मुंबई क्राईम ब्रँच आणि काळाचौकी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली असून चोरीला गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलीसाना यश आले आहे.महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे जैन समुदायामध्ये खळबळ उडाली होती.
हे ही वाचा:
झारखंडमध्ये ‘टायगर’चे आत्मसमर्पण!
ट्रम्प-इराण तणावाने बाजारात भूकंप; मोठ्या घसरणीनंतर पुन्हा सावरला शेअर बाजार
राघव चड्ढा यांची ‘आप’च्या राज्यसभेतील उपनेतेपदावरून हकालपट्टी
बंगाल कोळसा तस्करी प्रकरणी आय-पॅकच्या तीन कार्यालयांवर छापे
मुंबईतील करीरोड – लालबाग या ठिकाणी ‘वन अविघ्न पार्क’ या टोलेजंग इमारतीच्या आवारात जैन मंदिर आहे. या मंदिराला आणि सोसायटीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.महावीर जयंती निमित्ताने मंदिर विश्वस्त यांनी पावणे दोन कोटी रुपये किंमतीचे सोने आणि हिरेजडित दागिने भगवान महावीर यांच्या मूर्तीला चढवले होते.३० मार्च रोजी पहाटे २.३० ते ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने मंदिरातील मौल्यवान दागिने चोरीला गेल्याची तक्रार काळाचौकी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.मुंबई क्राईम ब्रँच आणि काळाचौकी पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासा दरम्यान २०० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. त्यातून आरोपी पूर्वी त्याच सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याचे समोर आले. काही कारणास्तव त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशात पळाल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी सापळा रचून आरोपीला त्याच्या नातेवाईकांच्या घराच्या छतावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
जितेंद्र उर्फ जितेन उर्फ बंटी उर्फ पंडित नगाईच (३४ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जितेंद्र याने चोरलेले पावणे दोन लाख रुपये किंमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. जितेंद्र हा मीरा रोड येथील एका सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये नोकरीला होता, या एजन्सीने वन अविघ्न पार्क येथे पुरवलेल्या सुरक्षा रक्षकामध्ये जितेंद्र हा देखील होता, एजन्सीने घटनेच्या काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मध्य प्रदेशात आर्म्स अॅक्टसह एकूण १७ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.







