मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नायगाव परिसराजवळ असलेल्या हॉटेल मॅट्रिक्समध्ये अवैधरित्या आणि कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय वास्तव्य करणाऱ्या सात बांगलादेशी तृतीयपंथी नागरिकांना मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी परकीय नागरिक कायद्यांतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २६ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आदेशानुसार, मुंबई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ए.टी.सी. पथकाने हॉटेल मॅट्रिक्स, मुंबई-अहमदाबाद हायवे, नायगाव पूर्व, जिल्हा पालघर येथे छापा टाकला. या कारवाईत संशयितरीत्या वास्तव्य करणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेण्यात आले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एक्स खात्यांना नोटिसा
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, कालबाह्य अन्न; मुंबईतील पाच क्लब्सचे परवाने निलंबित
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलक भारतासारखेच शत्रू!
माहीममध्ये भरधाव केटीएममुळे दुचाकीस्वार, महिलेचा मृत्यू
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची कसून चौकशी केली असता, ते सर्वजण बांगलादेशचे नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे भारतात प्रवेश करण्यासाठी किंवा वास्तव्य करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी अथवा वैध पासपोर्ट किंवा विसा आढळला नाही. मात्र, त्यांच्याकडे बांगलादेशचे जन्म दाखले व नागरिकत्वाचे पुरावे मिळाले आहेत. तसेच त्यांच्या मोबाईलमधील मेसेंजर चॅट्स व बांगलादेशी संपर्कांमुळे ते परदेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मो. जिहाद मो. मोहम्मिल अली (२२),मो. हमीदूर मो. बेलाल रहमान (१८), मो. जाहेदुल हक मो. शुकूर अली (२३),मो. जॉनी बाबू मो. शाहिदूल इस्लाम (१८),आकी मो. नागरअली मोनी (२१),मो. मुशरफ फैदुश खान (२२) आणि पिहू इस्लाम अशीर उद्दीन (२३) असे ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी तृतीय पंथीयांची नावे आहेत. ही धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग), पोलीस उप आयुक्त (पश्चिम परिमंडळ ३) आणि साहाय्यक पोलीस आयुक्त (अंधेरी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
