ब्लिंकइटच्या गोदामात झुरळेच झुरळे; परवाना रद्द

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत गंभीर स्वच्छता, अन्नसाठवणुकीतील त्रुटी

ब्लिंकइटच्या गोदामात झुरळेच झुरळे; परवाना रद्द

मालाड पश्चिम येथील ब्लिंकइटच्या स्टोअरमध्ये गंभीर स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या त्रुटी आढळून आल्याने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कंपनीचा अन्न परवाना निलंबित केला आहे. तपासणीत फळे आणि भाज्यांच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात झुरळे आढळली. याशिवाय अन्नपदार्थ जमिनीवर ठेवणे, गंजलेल्या रॅक्सचा वापर, कोल्ड स्टोरेजची खराब स्थिती आणि कीटक नियंत्रणाच्या अपुऱ्या उपाययोजना आढळून आल्या.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मालाड पश्चिम येथील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सुविधेची तपासणी केली. यावेळी काही अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवलेले आढळले, तर काही रॅक्स गंजलेल्या अवस्थेत होते. कोल्ड स्टोरेजची योग्य देखभाल केली जात नसल्याचेही निदर्शनास आले. तपासणीदरम्यान काही मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले. काही पॅकेजेस खराब झालेले किंवा त्यांच्याशी छेडछाड झाल्याचे दिसून आले. अन्नसाठवणुकीसाठी ‘फर्स्ट इन, फर्स्ट आउट’ (FIFO) आणि ‘फर्स्ट एक्सपायरी, फर्स्ट आउट’ (FEFO) या पद्धतींचेही पालन केले जात नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाने नमूद केले.

याशिवाय कचरा व्यवस्थापन आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेतही त्रुटी आढळल्या. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी आणि आरोग्य नोंदी अपुऱ्या होत्या. आवश्यक वैयक्तिक सुरक्षा साधनांची उपलब्धताही समाधानकारक नसल्याचे तपासणीत आढळले. या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ३२(३) अंतर्गत ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. पुढील आदेश मिळेपर्यंत संबंधित ठिकाणी अन्न व्यवसायाचे कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

अमुलच्या बनावट दुध पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा

उत्तराखंडमध्ये ढगफुटीसह मुसळधार पावसाचा कहर; पूल गेला वाहून

फुकेत-दिल्ली विमानातील ऑटोपायलट बंद, हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड

पीओकेमधील हिंसक आंदोलनानंतर पाक सरकार बॅकफूटवर; चर्चेची तयारी

दरम्यान, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यात अन्नसुरक्षेबाबत व्यापक कारवाई करत २५ मे ते ३१ जुलै या कालावधीत ३,१३७ हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्य आस्थापना आणि इतर अन्न व्यवसायांची तपासणी केली. यामध्ये ७६४ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर १६५ अन्न परवाने निलंबित करण्यात आले. तसेच २८.६६ लाख किलो असुरक्षित अन्नपदार्थ जप्त किंवा नष्ट करण्यात आले असून त्यांची किंमत ५५.७२ कोटी रुपये होती.

Exit mobile version