मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील सिरोंज तहसीलमधील गोपालनगर गावात असलेल्या सुमारे १००० वर्षे जुन्या भगवान विष्णू मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करत प्राचीन तसेच नव्या दगडी मूर्तींची विटंबना केली आहे. हे मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली असून परिसरातील अनेक गावांसाठी हे धार्मिक आणि ऐतिहासिक श्रद्धेचे केंद्र मानले जाते.
संबंधित घटना ८ आणि ९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडल्याचे सांगितले जात आहे. रविवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी आरतीनंतर मुख्य पुजाऱ्यांनी मंदिर आणि गर्भगृह विधीपूर्वक बंद केले होते. मात्र, सोमवारी (९ फेब्रुवारी) सकाळी पुजाऱ्यांचे धाकटे भाऊ मोनू शर्मा मंदिरात आले असता मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले आढळले. आत तपासणी केल्यावर दोन्ही गर्भगृहांची कुलुपेही फोडण्यात आल्याचे दिसून आले.
मंदिरातील प्राचीन दगडी भगवान विष्णूंच्या मूर्तीचे पाय तोडले गेले होते आणि ती मूर्ती गर्भगृहातच ठेवलेली होती. शेजारच्या गर्भगृहात स्थापित केलेल्या तुलनेने नव्या मूर्तीचेही पाय तोडण्यात आले होते. अहवालानुसार, नव्या मूर्तीचे तुटलेले पाय दुसऱ्या मूर्तीच्या जवळ ठेवले होते. याशिवाय मंदिर परिसरातील इतर मूर्तींचेही नुकसान करण्यात आले आहे. मंदिरात ठेवलेल्या देवाच्या वस्त्रांची संदूक उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त पसरवलेले होते. त्यामुळे आरोपींनी एखाद्या मौल्यवान वस्तूचा शोध घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मंदिरात सोने-चांदीचे दागिने किंवा दानपेटी नसल्याचे सांगण्यात येते. ग्रामस्थांच्या मते, काही वर्षांपूर्वी प्राचीन मूर्तीचा एक भाग खराब झाल्यानंतर मंदिर परिसरात नवीन गर्भगृह बांधून नवी मूर्ती स्थापित करण्यात आली होती. या घटनेच्या रात्री आरोपींनी दोन्ही मूर्तींना लक्ष्य केले.
हे ही वाचा:
हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून काँग्रेस नेत्यांवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा
एका कुटुंबातील पाच जणांचा विष प्राशन करून आत्महत्या
डिजिटल दहशतीचे नवे रूप; बिश्नोई गँगचे पोलिसांसमोर आव्हान
अफगाणिस्तानातून डाळींबही येत नाहीत, पण दहशतवादी येतात!
घटनेची माहिती मिळताच गावात तीव्र संतापाची लाट उसळली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मंदिर परिसरात जमले. त्यांनी गोपालनगर- दीकनखेडा मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आणि ४८ तासांच्या आत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली असलेल्या धार्मिक स्थळाच्या सुरक्षेत प्रशासनाने गंभीर निष्काळजीपणा केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दीकनखेडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि एसडीओपी सोनू डाबर घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच विश्व हिंदू परिषदेचे नेते राकेश सक्सेना आणि जगदीश शाक्यही गावात दाखल झाले. नंतर सिरोंजचे एसडीएम हरिशंकर विश्वकर्मा अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी आले आणि निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल.







