‘लाईफलाईन’ की ‘फाईटलाईन’? मुंबई लोकलमध्ये सीटच्या वादातून हाणामारी

दोन प्रवासी जखमी

‘लाईफलाईन’ की ‘फाईटलाईन’? मुंबई लोकलमध्ये सीटच्या वादातून हाणामारी

मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, आता मध्य रेल्वेवर सीटच्या किरकोळ वादातून दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या सलग घटनांमुळे मुंबई लोकलमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास परेल-अंबरनाथ लोकल धावत असताना सामानाच्या डब्यात (लगेज कोच) दोन प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. धावत्या लोकलमध्येच दोघे एकमेकांवर तुटून पडल्याने इतर प्रवाशांमध्येही घबराट पसरली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने कल्याण स्थानकावर रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांना सतर्क केले. ट्रेन स्थानकात पोहोचताच दोन्ही जखमींना बाहेर काढून तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्यानंतर रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका प्रवाशाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले. या मारहाणीत प्रीतेश कनोजिया (३१), साहिल खंदारे (१९), राजू वाघे (१९) हे तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली. सुरुवातीला चाकू किंवा धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र जीआरपीच्या चौकशीत दोघांकडेही कोणतेही शस्त्र नसल्याचे स्पष्ट झाले. हाणामारीदरम्यान एका प्रवाशाच्या हातातील लोखंडी कड्याचा (कडा) जोरदार फटका दुसऱ्याच्या डोक्यावर बसल्याने गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कल्याण जीआरपीने गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा:

न्यायाधीश असतानाच एलपीजी एजन्सी चालवली? वितरण अधिकार निलंबित

‘नो एंट्री’ पुलावर बर्थडे पार्टी! २६ कोटींच्या पुलावर वाढदिवसाचा धुमाकूळ

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर तात्पुरती बंदी

“श्रीकृष्ण मुस्लिम होते, दिवसातून पाच वेळा नमाज पढत होते” मौलाना बरळले

काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वे मार्गावर चाकू हल्ल्यात प्रवाशाचा झाला होता मृत्यू

ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये एका प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. दरवाजा बंद करण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या किरकोळ वादानंतर आरोपीने २२ वर्षीय तरुणावर वार करत त्याची हत्या केली होती. त्या प्रकरणानंतर रेल्वेतील सुरक्षा व्यवस्था आणि शस्त्रांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.

आता मध्य रेल्वेवरील ताज्या हाणामारीच्या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. मात्र किरकोळ कारणांवरून होणारे वाद हिंसक स्वरूप धारण करत असल्याने रेल्वे प्रशासनाने सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Exit mobile version