राजस्थानची राजधानी जयपूरमधील नीरज शर्मा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच आता या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे. आई नीरज शर्मा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या आयुषी शर्मावर आता तिच्या वडिलांच्या मृत्यूबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. आयुषीचे काका राकेश शर्मा यांनी “माझा भाऊ विजय शर्मा यांचाही मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांच्या मृत्यूमागेही आयुषीचा हात असू शकतो,” असा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर पोलिसांकडून या दाव्याची पडताळणी केली जात आहे.
यापूर्वी जयपूर पोलिसांनी आयुषी शर्मा हिने आई नीरज शर्मा यांच्या हत्येसाठी तब्बल ७ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा दावा केला होता. पोलिसांच्या तपासानुसार, मालमत्तेवर ताबा मिळवणे आणि आईच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावरील सरकारी नोकरी मिळवणे हा या हत्येमागील प्रमुख हेतू होता. यासाठी अपघाताचा बनाव रचत एसयूव्हीने नीरज शर्मा यांना चिरडून ठार मारण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आयुषीसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आयुषी आणि तिच्या सहकाऱ्यांनी आईची हत्या करण्यासाठी यापूर्वीही विविध मार्गांचा विचार केला होता. घराला आग लावणे, इतर पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न करणे आणि नंतर अखेर रस्ता अपघाताचा बनाव रचून हत्या करणे, अशा अनेक पर्यायांवर चर्चा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कटात काही नातेवाईकांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
‘रोडमॅप २०३०’ला मंजुरी; भारत-न्यूझीलंड व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य
“माझ्या हत्येचा प्रयत्न झाला, तर इराणवर १,००० क्षेपणास्त्रे डागणार”
१९९६ श्रीनगर हिंसाचार प्रकरणात शब्बीर शाहसह सहा हुर्रियत नेत्यांविरोधात आरोपपत्र
दरम्यान, आयुषीचे काका राकेश शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना विजय शर्मा यांच्या मृत्यूबाबतही चौकशीची मागणी केली. त्यांच्या मते, विजय शर्मा यांच्या मृत्यूच्या परिस्थितीची नव्याने चौकशी झाली पाहिजे. मात्र, पोलिसांनी अद्याप या आरोपांची अधिकृत पुष्टी केलेली नसून, सर्व बाबींची तपासणी सुरू असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाने संपूर्ण राजस्थान हादरले असून, मालमत्ता आणि सरकारी नोकरीच्या हव्यासातून मुलीनेच आईच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप समाजमनाला हादरवणारा ठरला आहे. आता वडिलांच्या मृत्यूबाबत नव्याने झालेले आरोप तपासाला आणखी वेग देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
