नोएडा कामगार आंदोलनामागे ‘पाकिस्तान लिंक’; नियोजित कट असल्याचे उघड

पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे

नोएडा कामगार आंदोलनामागे ‘पाकिस्तान लिंक’; नियोजित कट असल्याचे उघड

उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी कामगारांनी आंदोलन करून त्यांच्या काही मागण्या समोर आणल्या होत्या. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले होते. अशातच आता पोलिसांनी म्हटले आहे की, नोएडातील कारखान्यातील कामगारांनी केलेली अलीकडील हिंसक निदर्शने हा एक “नियोजित आणि बहुस्तरीय कट” होता, जो पाकिस्तानस्थित दोन सोशल मीडिया खात्यांच्या मदतीने रचण्यात आला होता. या खात्यांनी पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याचे खोटे दावे पसरवले होते.

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह म्हणाल्या की, जास्त वेतनाच्या मागणीतून सुरू झालेल्या या अशांततेला बाह्य घटकांनी आपल्या ताब्यात घेतले होते. त्यांनी पुष्टी केली की, उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयांवर कामगार समाधानी असून ते कामावर परतले आहेत आणि आता परिस्थिती सामान्य झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारून वेतनवाढ केली आणि वेतन मंडळाच्या स्थापनेची घोषणा केली. या उपाययोजना कामगारांपर्यंत पोहोचताच त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले, असेही त्या म्हणाल्या.

मात्र, १३ एप्रिल रोजी एका गटाने हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, पण त्यानंतर दोन एक्स हँडल्सनी पोलिसांच्या गोळीबारात अनेक जण ठार झाल्याचा दावा करत खोटी माहिती पसरवण्यास सुरुवात केली. “आम्ही याची पडताळणी केली असता, हे दोन्ही एक्स हँडल्स पाकिस्तानमधून चालवले जात असल्याचे आढळले. व्हीपीएनचा (VPN) गैरवापर केला जात आहे,” असे त्या म्हणाल्या.

मीर इलायासी आणि आयुषी तिवारी यांसारख्या नावांनी पाकिस्तानमधून जवळपास तीन महिने चालवल्या गेलेल्या दोन ‘एक्स हँडल्स’नी अशांतता वाढवण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली. त्यांनी पोलिसांच्या गोळीबारात अनेक कामगारांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवल्या, ज्यामुळे आंदोलने अधिक तीव्र झाली. या हिंसाचाराच्या संबंधात १३ एफआयआर दाखल करण्यात आले असून, आतापर्यंत ६२ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी बहुतेक जण स्थानिक कार्यकर्ते नसून बाहेरील होते. इंटेलिजन्स ब्युरो आणि दहशतवादविरोधी पथकासह केंद्रीय यंत्रणा पाकिस्तान संबंधांच्या तपासात सहकार्य करत आहेत.

हे ही वाचा:

सातवे सोनेरी पान लिहिले जाते आहे… ज्येष्ठ संघकर्मी भैय्याजी जोशी

व्ही. ई.एस. लॉ कॉलेजची यशस्वी सुरुवात

मुंबईच्या नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्स आणि चोरीचा थरार

नेस्कोतील रेव पार्टीच्या संदर्भात टेक्नो ग्रुपवर कारवाई हवी

तपासात रुपेश राय, मनीषा चौहान आणि आदित्य आनंद या तीन मुख्य सूत्रधारांची ओळख पटली आहे. राय आणि चौहान यांना अटक करण्यात आली असून, आनंद अद्याप फरार आहे. पोलिसांनी सांगितले की, हे तिघे जमावाला भडकवण्यात सक्रियपणे सहभागी होते आणि त्यांचे संबंध देशभरातील पूर्वीच्या आंदोलनांशी होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे तिघे केवळ नोएडामध्ये उपस्थित नव्हते, तर त्यांनी कार्यकर्त्यांना भडकवण्यात आणि जमावाला चिथावणी देण्यातही सक्रिय भूमिका बजावली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा कट ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी रचण्यात आला होता, आणि आयोजकांनी ९ आणि १० एप्रिल रोजी लोकांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यासाठी क्यूआर कोडचा वापर केला. १० एप्रिल रोजी आंदोलने सुरू झाली, ११ एप्रिल रोजी रस्ते अडवण्यात आले आणि १३ एप्रिल रोजी एका कंपनीबाहेर मोठा जमाव जमल्याने तणाव पुन्हा वाढला.

Exit mobile version