मुंबई: गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शनिवारी पार पडलेला ‘टेक्नो नाईन टाईम्स नाईन’ म्युझिक कॉन्सर्ट वादाच्या भीषण भोवऱ्यात सापडला आहे. या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचले आहेत. दुसरीकडे, या कॉन्सर्टमध्ये आलेले तरुण आता पोलीस कारवाई आणि ड्रग्सच्या भीतीपोटी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत असल्याचे समोर येत आहे.
या कॉन्सर्टचे आयोजन करणाऱ्या कंपनीचे नागपूर कनेक्शन समोर आले आहे. ‘इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शन’ ही कंपनी नागपूरच्या संजय गांधी नगरमधील असून, नेस्को आणि या कंपनीने मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत नेस्कोचे सन्नी जैन आणि बालकृष्णन कुरूप यांच्यासह इन्स्पायरिंग टायचा संस्थापक आकाश सामल याला अटक केली आहे. तसेच, ड्रग्स पुरवठा साखळीत सहभागी असल्याच्या संशयावरून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याला आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा:
नेस्कोतील रेव पार्टीच्या संदर्भात टेक्नो ग्रुपवर कारवाई हवी
जैशची महिला शाखा देशात सक्रीय आहे का?
दिल्ली विमानतळावर स्पाइसजेट आणि आकासा एअर विमानांच्या पंखाची ऐकमेकांना धडक
आरक्षणातून महिलांना काहीतरी देत आहोत हा भ्रम नको; तो त्यांचा हक्क!
गर्दीचा फायदा घेत ‘आयफोन’वर डल्ला……
म्युझिक कॉन्सर्टमध्ये केवळ ड्रग्सचाच सुळसुळाट नव्हता, तर मोबाईल चोरांनीही येथे धुमाकूळ घातला. गर्दीचा फायदा घेत चोरांनी विशेषतः हाय-एंड आयफोन्सना लक्ष्य केले. आतापर्यंत किमान सहा जणांचे महागडे फोन चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये चार तरुण आणि दोन तरुणींचा समावेश असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
कॉन्सर्टमध्ये झालेल्या ड्रग्सच्या वापरामुळे आणि दोन मृत्यूंमुळे सहभागी झालेले तरुण (रेव्हर्स) प्रचंड दहशतीखाली आहेत. पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल किंवा ड्रग्सच्या चौकशीची झळ आपल्यापर्यंत पोहोचेल, या भीतीने अनेक तरुण विचलित झाले आहेत. ऐन परीक्षेचा काळ असल्याने आणि घरी काय उत्तर द्यायचे, अशा दुहेरी पेचात अडकल्यामुळे या तरुणांनी आता मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेतली आहे. या मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी ते तज्ज्ञांना विनवणी करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबईतील मोठ्या म्युझिक कॉन्सर्टमधील सुरक्षा आणि तिथे होणारे अंमली पदार्थांचे सेवन यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.







