उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने उघड केलेल्या एका धक्कादायक कटामुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पाकिस्तानशी संबंध असलेल्या एका संशयित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत एटीएसने चार जणांना अटक केली असून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये मोठे हल्ले घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना कट्टरतेकडे वळवून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा गंभीर प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मेहकाब, गगनदीप सिंह उर्फ गुरी, शाहरुख आणि मुशर्रफ यांचा समावेश आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हे सर्वजण पाकिस्तानमध्ये बसलेल्या शहजाद भट्टी आणि अबिद जट्ट या गुन्हेगारी व दहशतवादी नेटवर्कशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात होते. सोशल मीडियावरून त्यांना सूचनांचे आदानप्रदान होत होते. युवकांना धार्मिक आणि भावनिक मुद्द्यांवर भडकावून त्यांचा वापर ‘स्लीपर सेल’ म्हणून करण्याची योजना आखण्यात आली होती.
हे ही वाचा:
घुसखोर स्वतःहून परत गेले तर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही
ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना अटक
बंगालमध्ये मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी इस्कॉन मंदिरात केली गौपूजा
मैत्रीसाठी नकार मिळाल्यानंतर अश्लील एआय फोटो, व्हिडिओ बनवून केले प्रसारित
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती. गर्दीची रुग्णालये, राजकीय पक्षाचे कार्यालय आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित काही व्यक्तींना लक्ष्य करण्याची तयारी सुरू होती. आरोपींनी काही ठिकाणांचे व्हिडीओ, छायाचित्रे आणि लोकेशन पाकिस्तानमध्ये पाठवल्याचेही उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हॉस्पिटलमध्ये स्फोट कसा घडवून आणता येईल, याबाबत इंटरनेटवरून माहिती शोधली जात असल्याचे तपासात आढळले आहे.
एटीएसच्या कारवाईदरम्यान आरोपींच्या मोबाईलमधून अनेक धक्कादायक पुरावे सापडले. त्यात पाकिस्तानमधील संपर्कांचे क्रमांक, व्हॉईस नोट्स, व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग आणि गुप्त चॅटचा समावेश आहे. काही आरोपींना आर्थिक मदत, शस्त्रे आणि लॉजिस्टिक सपोर्ट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सुरक्षा दलांवर हल्ला करून त्याचे व्हिडीओ पाकिस्तानमध्ये पाठवण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश एटीएसने शहजाद भट्टीशी संबंधित अनेक मॉड्यूलचा भंडाफोड केला आहे. आतापर्यंत अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून काही आरोपींना तुरुंगातही पाठवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानेही या नेटवर्कविरोधात स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
या प्रकरणामुळे सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड अॅप्सच्या माध्यमातून भारतात दहशतवादी जाळे विस्तारण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती अधिक गडद झाली आहे. देशातील शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अशा नेटवर्कविरोधात तपास यंत्रणांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
