बांद्रा पूर्वेतील खेरवाडी परिसरात सोमवारी दुपारी एका सुरक्षा रक्षकाची अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
मृत सुरक्षा रक्षकाचे नाव अभिनव चौधरी (वय ५६) असून ते बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी होते. ते एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ते ड्युटीवर असताना ही घटना घडली.
हे ही वाचा:
मुंबई हादरली! ड्रग्ज ओव्हरडोसने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू
‘भोंदू बाबा’ अशोक खरातच्या साम्राज्यावर ईडीचा हातोडा
झांसीत हिंदू विद्यार्थिनींना धर्मांतरित करू पाहणारा शिक्षक सोहेलला अटक
पुरुष पोलिस कॉन्स्टेबलला धर्मांतरित केले, निकाह करायला भाग पाडले!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौधरी यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांच्या मानेवर व हातांवर गंभीर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मोबाईल कॉलला प्रतिसाद न दिल्याच्या कारणावरून आरोपीने चौधरी यांच्याशी वाद घालत हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना खेरवाडीतील म्हाडा कार्यालयासमोर घडली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
