33 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरधर्म संस्कृतीमराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांवर आता जागतिक मोहोर

मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांवर आता जागतिक मोहोर

रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, प्रतापगड, जिंजी या किल्ल्यांचा समावेश

Google News Follow

Related

मराठा शासनाच्या काळातील १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे. तामिळनाडूचा जिंजी किल्ला देखील या यादीचा भाग आहे. सर्व किल्ले १७ व्या ते १९ व्या शतकादरम्यान बांधले गेले.
महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांमध्ये सिंधुदुर्ग आणि शिवनेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला रायगड किल्लाही याच यादीत आहे. याशिवाय साल्हेर, लोहगड, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग या किल्ल्यांचा समावेश आहे. पॅरिसमध्ये झालेल्या युनेस्कोच्या ४७ व्या बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. यामुळे मराठा इतिहास आणि वारशाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. आता भारतातील एकूण ४४ वारसा स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
पॅरिस येथे झालेल्या युनेस्कोच्या ४७व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात भारताच्या २०२४-२५च्या अधिकृत नामनिर्देशनास मान्यता देत “Maratha Military Landscapes of India” या नावाने १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला. यामुळे भारताचे एकूण जागतिक वारसा स्थळांचे संख्यात्मक स्थान ४४ वर पोहोचले. या ऐतिहासिक मान्यतेमुळे भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा गौरवपूर्ण प्रदर्शन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले.
या यादीत महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. हे किल्ले समुद्रकाठी, बेटांवर, डोंगराळ भागांत व दाट जंगलांमध्ये स्थित असून मराठा साम्राज्याच्या १७व्या ते १९व्या शतकातील लष्करी दूरदृष्टी, स्थापत्यकलेतील कल्पकता आणि भौगोलिक आकलनाचे अप्रतिम दर्शन घडवतात. भारताच्या प्रस्तावास युनेस्कोच्या २० पैकी १८ सदस्यांनी पाठिंबा दिला. युनेस्कोच्या ICOMOS आणि IUCN संस्थांनीही भारताचे अभिनंदन केले.

ही मान्यता केवळ ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन यापुरती मर्यादित नाही, तर ती भारताच्या समृद्ध वारशाला जागतिक व्यासपीठावर अधोरेखित करणारी आहे. भारत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचा २०२१–२५ या कालावधीसाठी सदस्य असून, ६२ स्थळे सध्या संभाव्य यादीत आहेत. ही मान्यता ‘नव्या भारताच्या’ सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मिळालेली पोचपावती आहे.

१. साल्हेर किल्ला

भौगोलिक स्थान: नाशिक जिल्हा, महाराष्ट्र. हा एक डोंगरी किल्ला आहे.

बांधकाम: याचा नेमका कालखंड व निर्माते अज्ञात आहेत, मात्र हा मराठ्यांपूर्वीचा असून कदाचित पूर्वीच्या राजवटींनी बांधलेला असावा.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली: साल्हेर हा एक सामरिकदृष्ट्या महत्वाचा किल्ला होता. १६७२ मध्ये येथे मराठ्यांचा मुघलांविरुद्धचा साल्हेरचा संग्राम झाला. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोठा विजय मिळवला. या लढाईने मराठ्यांचे सामर्थ्य बळकट झाले. पुढे हा किल्ला मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा ठाणे बनला.

२. शिवनेरी किल्ला

भौगोलिक स्थान: जुन्नर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र. हा एक डोंगरी किल्ला आहे.

बांधकाम: यादव वंशाने १३व्या शतकात बांधल्याचे मानले जाते. नंतर बहमनी व निजामशाहीच्या अधिपत्याखाली गेला.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली: हा किल्ला १६३० साली छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या वेळी हा निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. पुढे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसह या किल्ल्यालाही मराठ्यांच्या प्रभावाखाली आणले.

३. लोहगड किल्ला

भौगोलिक स्थान: लोणावळा, पुणे जिल्हा. हा डोंगरी किल्ला आहे.

बांधकाम: सातवाहन काळापासूनचा इतिहास असून पुढे विविध राजवटींनी त्यात सुधारणा केल्या.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली: छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये ताब्यात घेतला. १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानंतर मुघलांना दिला गेला, पण १६७० मध्ये पुन्हा मराठ्यांनी जिंकला. व्यापार मार्गाचे संरक्षण करणारा महत्त्वाचा किल्ला होता.

४. खांदेरी किल्ला

भौगोलिक स्थान: अलीबागच्या किनाऱ्याजवळ, रायगड जिल्हा. हा एक सागरी किल्ला आहे.

बांधकाम: छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रातील व्यापारी मार्गांवर नियंत्रण मिळवण्यासाठी १६७९ मध्ये बांधण्यास सुरुवात केली.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली: मराठ्यांच्या नौदल धोरणात खांदेरीचा महत्त्वाचा वाटा होता. इंग्रज आणि सिद्दींच्या आक्रमणांना तोंड देत मराठ्यांनी हा किल्ला राखला आणि आपले समुद्री सामर्थ्य सिद्ध केले.

५. रायगड किल्ला

भौगोलिक स्थान: महाड, रायगड जिल्हा. हा डोंगरी किल्ला आहे.

बांधकाम: प्राचीन किल्ला असून १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून निवडून विस्तार केला.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली: मराठा साम्राज्याची राजधानी. याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. हा किल्ला मराठ्यांच्या सार्वभौमतेचे प्रतीक होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी ताबा घेतला, पण नंतर मराठ्यांनी पुन्हा ताबा मिळवला.

६. राजगड किल्ला

भौगोलिक स्थान: वेल्हे, पुणे जिल्हा. डोंगरी किल्ला.

बांधकाम: आधीच अस्तित्वात असलेल्या किल्ल्याचा शिवाजी महाराजांनी ताबा घेत मोठ्या प्रमाणावर विकास केला.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली: रायगडचा विकास होण्याआधी जवळपास दोन दशके मराठा साम्राज्याची राजधानी. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा व राज्यकारभार येथूनच यशस्वीपणे हाताळला.

७. प्रतापगड किल्ला

भौगौकिक स्थान: महाबळेश्वर, सातारा जिल्हा. डोंगर व जंगलामधील किल्ला.

बांधकाम: १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली बांधला.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली: १६५९ मध्ये अफजल खानाचा पराभव व मृत्यू येथेच झाला. ही लढाई मराठा इतिहासातील निर्णायक घटना ठरली.

८. सुवर्णदुर्ग किल्ला

भौगोलिक स्थान: हरनाईजवळ, रत्नागिरी जिल्हा. सागरी किल्ला.

बांधकाम: विजापूरच्या आदिलशाही बादशहाने बांधला. शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये ताबा घेऊन मजबुतीकरण केले.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली: मराठा नौदलाच्या सामर्थ्याचे मुख्य केंद्र. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग यांच्यासह कोकण किनारपट्टीचे संरक्षण करणारे महत्त्वाचे त्रिकोण तयार करत होते.

९. पन्हाळा किल्ला

भौगोलिक स्थान: कोल्हापूर जिल्हा. पठारावरील डोंगरी किल्ला.

बांधकाम: शिलाहार काळात (११७८–१२०९) बांधला गेला, नंतर यादव, बहमनी व विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात गेला.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली: शिवाजी महाराजांनी अनेक वेळा ताबा घेतला. १६६० मध्ये सिद्दी जौहरच्या वेढ्यातून नाट्यपूर्ण सुटका याच किल्ल्यावरून झाली. पुढे कोल्हापूर दरबाराची राजधानी बनला.

१०. विजयदुर्ग किल्ला

भौगोलिक स्थान: देवगड तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा. सागरी किल्ला.

बांधकाम: प्राचीन इतिहास असून, कदाचित राजा भोज द्वितीय याने १३व्या शतकात बांधला. १६५३ मध्ये शिवाजी महाराजांनी ताबा घेतला व मजबुतीकरण केले.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली: छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढे कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली मराठा नौदलाचा मुख्य तळ. अजेय संरचना व स्थानामुळे तो एक अतिशय महत्त्वाचा किल्ला होता.

११. सिंधुदुर्ग किल्ला

भौगोलिक स्थान: मालवणजवळ, सिंधुदुर्ग जिल्हा. सागरी किल्ला.

बांधकाम: छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्दी व युरोपीय सत्तांना आव्हान देण्यासाठी १६६४ मध्ये बांधण्यास सुरुवात केली.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली: मराठा नौदलाची महत्त्वाकांक्षा व सामर्थ्य याचे प्रतीक. संपूर्णपणे अजेय आणि सागरी संरक्षणासाठी निर्णायक ठिकाण.

१२. जिंजी किल्ला

भौगोलिक स्थान: विल्लुपुरम जिल्हा, तामिळनाडू. डोंगरी किल्ल्यांचा समूह.

बांधकाम: ९व्या शतकात कोनार राजवटीने बांधले. नंतर विजयनगर, नायक व विजापूरच्या ताब्यात होता. मराठ्यांच्या अधिपत्याखाली: १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहिमेत ताबा घेतला. मुघल-मराठा संघर्षाच्या काळात राजाराम महाराजांनी याला काही काळ राजधानी बनवले. दक्षिण भारतातील मराठ्यांच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचे केंद्र.

हे ही वाचा:

हरिद्वारमध्ये कावड्यांचा महापूर: १० लाख भाविकांनी भरले गंगाजल!

ज्येष्ठ तेलुगू चित्रपट अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे हैदराबाद येथे निधन

उत्तर प्रदेशने कुठल्या क्षेत्रात घडवली क्रांती…

पार्किन्सन रुग्णांसाठी नवी इंजेक्शन थेरपी

 

या मान्यतेमुळे अनेक लाभ होण्याची संभावना आहे :जागतिक मान्यता व प्रतिष्ठा: युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्याने या ठिकाणांना जागतिक स्तरावर मान्यता मिळते. लष्करी दृष्टिकोन, वास्तुशैली आणि सांस्कृतिक महत्त्व याबाबत त्यांची “असाधारण सार्वत्रिक मूल्य” म्हणून ओळख होते. यामुळे भारताच्या समृद्ध वारशाचा अभिमान वाढतो आणि आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले जाते.पर्यटनवृद्धी: जागतिक वारसा दर्जा मिळाल्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये लक्षणीय वाढ होते. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम होते, रोजगारनिर्मिती होते आणि किल्ल्यांच्या परिसरात पायाभूत सुविधा विकसित होतात.

संवर्धन आणि जतनासाठी चालना: युनेस्कोचा दर्जा मिळाल्याने या स्थळांच्या संरक्षणासाठी अधिक काटेकोर उपाययोजना केल्या जातात. पुनर्बांधणी, देखभाल आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय निधी व तज्ज्ञांची मदत मिळू शकते, ज्यामुळे ह्या ऐतिहासिक वास्तू पुढील पिढ्यांसाठी जतन करता येतात.

शोध व शिक्षणाला चालना: ही मान्यता मराठा वास्तुकला व इतिहास यावरील संशोधनास प्रोत्साहन देईल. त्यामुळे त्या काळातील समज अधिक गहिरा होतो आणि माहितीचा व्यापक प्रसार होतो. पर्यटक व विद्यार्थ्यांसाठीही शिक्षणाची संधी उपलब्ध होते.

स्थानिक सहभाग व जनजागृती: या स्थळांकडे वाढलेले लक्ष स्थानिक समुदायांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते आणि संवर्धन व प्रचार यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढवतो. आंतरराष्ट्रीय सहकार्य: युनेस्कोचा दर्जा वारसा व्यवस्थापन आणि संवर्धन यामधील सर्वोत्तम अनुभवांची देवाणघेवाण व आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा