मौनी अमावस्येपूर्वी संगम परिसरात चेंगराचेंगरी; ३० भाविकांचा मृत्यू

६० जण जखमी

मौनी अमावस्येपूर्वी संगम परिसरात चेंगराचेंगरी; ३० भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभाच्या मौनी अमावस्येपूर्वी संगम परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत अनेक भाविकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, काही जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मौनी अमावस्येनिमित्त पवित्र शाही स्नान करण्यासाठी म्हणून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास संगम घाटावर चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगारचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला तर ६० जण जखमी झाले आहेत. जखमी रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डीआयजी वैभव कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २५ जणांची ओळख पटली असून उर्वरित ५ जणांची ओळख पटवली जात आहे, असे डीआयजी वैभव कृष्णा यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही “अत्यंत दुःखद” घटना म्हटले आणि “आपल्या प्रियजनांना गमावलेल्या भक्तांप्रती तीव्र शोक” व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी तीन वेळा चर्चा करत परिस्थतीचा आढावा घेतला. तसेच ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता परिस्थिती सामान्य असून भाविक संगमात स्नान करत. 

चेंगराचेंगरीनंतर अमृतस्नान रद्द करण्यात आल्याचे आखाड्यांनी (मठांचे आदेश) यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, चेंगराचेंगरीनंतर गर्दी ओसरल्यानंतर आखाडे नियोजित प्रमाणे स्नान पुढे जातील असे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, सकाळी कोट्यवधी लोक जमले होते. आजचे स्नान पुढे ढकलण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण आता गर्दी कमी झाली आहे. ज्या ठिकाणी स्नान करायचे होते ती जागा मोकळी केली जात आहे. आम्ही पवित्र स्नान करू. मिरवणूक निघेल. सर्व आखाड्यांमधून ही मोठी मिरवणूक होणार नाही, तर रॅली निघणार आहे.

हे ही वाचा:

‘छावा’ चित्रपटातील ‘ते’ दृश्य हटणार, पण भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची आणखी एक मागणी!

राणा अय्युब विरुद्ध एफआयआर दाखल

विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या करण्यासाठी विद्यार्थ्याला १०० रुपयांची सुपारी!

एनआयएने तामिळनाडूमध्ये १६ ठिकाणी छापे

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला. आत्तापर्यंत कोट्यवधी देश- विदेशातील भाविकांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. आज महाकुंभमध्ये मौनी अमावस्येचे अमृत स्नान आहे. त्यासाठी कोट्यवधी भाविक संगमावर स्नानासाठी आले होते त्यामुळे प्रचंड गर्दी झाली. मौनी अमावस्येला अमृतस्नान हा महाकुंभातील सर्वात महत्त्वाचा विधी आहे.

Exit mobile version