उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी तमिळनाडूतील वेल्लोर येथील श्रीपुरममध्ये आयोजित श्रीशक्ती अम्मांच्या सुवर्णमहोत्सव समारंभात सहभाग घेतला आणि श्रीशक्ती अम्मांच्या पन्नास वर्षांच्या आध्यात्मिक यात्रेच्या या सोहळ्याचा भाग होण्याचा आनंद व्यक्त केला. उपराष्ट्रतींनी श्रीशक्ती अम्मांच्या धर्मनिष्ठतेवर भर देत सांगितले की त्यांचे मार्गदर्शन केवळ आध्यात्मिकतेपुरते मर्यादित नसून व्यापक सामाजिक सेवांपर्यंत विस्तारलेले आहे. त्यांनी श्रीपुरममध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांचे कौतुक केले. यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांना सायकली वाटप करण्यासारख्या दीर्घकालीन योजना तसेच दररोज हजारो लोकांना अन्नदान करणारा कार्यक्रम यांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांना त्यांनी भक्तीभावनेतून करण्यात येणारी खरी सेवा असे म्हटले.
सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले की श्रीपुरम परिसरात ५० हजारांहून अधिक झाडे लावण्यात आली असून जवळच्या कैलासागिरी टेकड्यांवर अनेक लाख रोपे लावली गेली आहेत. हे धरतीमातेचे आणि मानवतेचे मोठे योगदान असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरण संरक्षण उपक्रमांना बळकटी देणारे आहे, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की पर्यावरणाचे संरक्षण करणे ही स्वतःमध्येच एक प्रकारची दिव्य सेवा आहे. खरी आध्यात्मिकता प्रेम, करुणा आणि सहमानवांच्या सेवेत आहे.
हेही वाचा..
बांगलादेशात कट्टरपंथ्यांच्या बळी ठरला आणखी एक हिंदू
व्हेनेझुएलाचा भारतासोबतचा व्यापार खूपच कमी
भारतीय सेनेचा विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम
उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केले की खरी आध्यात्मिकता केवळ विधी-परंपरेतील पूजेमध्ये नसून प्रेम, करुणा आणि इतरांच्या सेवेमध्ये आहे. त्यांनी कवी सुब्रमण्यम भारती यांच्या शब्दांचा उल्लेख केला “प्रेमापेक्षा मोठी तपश्चर्या नाही.” समाजावर प्रेम करणे आणि त्याची सेवा करणे हे आध्यात्मिक शिस्तीचे सर्वोच्च रूप आहे, असे त्यांनी सांगितले. श्रीशक्ती अम्मा या आजच्या काळातील महान आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या जीवनातून आणि कार्यातून “प्रेम हेच ईश्वर आहे” या तत्त्वाचा आदर्श त्या घडवून आणत आहेत, असे उपराष्ट्रपती म्हणाले. याआधी उपराष्ट्रपतींनी वेल्लोर येथील श्रीपुरममधील श्री नारायणी मंदिरात दर्शन घेतले आणि सर्वांच्या शांततेसाठी, समृद्धीसाठी आणि आनंदासाठी देवी लक्ष्मीची प्रार्थना केली.







