“अटक झाली तरी मायदेशी परतणार” काय म्हणाल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान?

दोन वर्षांनंतर शेख हसीना यांची पहिली पत्रकार परिषद

“अटक झाली तरी मायदेशी परतणार” काय म्हणाल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आणि भारतात आश्रय घेतल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे दावे केले. दिल्लीतील फॉरेन करस्पाँडंट्स क्लबमध्ये आभासी माध्यमातून झालेल्या या परिषदेत त्यांनी आपण यंदाच्या डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतणार असल्याची घोषणा केली. मृत्युदंडाची शिक्षा, अटक किंवा जीवाला धोका असला तरी मायदेशी परतण्याचा निर्धार कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेख हसीना म्हणाल्या, “माझ्या लोकांसाठी मला परत जायचे आहे. तुरुंगात टाकले किंवा मृत्यू झाला तरी मी मागे हटणार नाही.” त्यांच्यावरील सर्व खटले राजकीय सूडातून दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. अवामी लीगवरील बंदी उठवून पक्षाला पुन्हा राजकारणात सहभागी होण्याची संधी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. तसेच राजकीय कैद्यांची सुटका आणि स्वतःवरील प्रकरणे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली.

२०२४ मध्ये त्यांच्या सरकारविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत हसीना यांनी वेगळी भूमिका मांडली. सुरुवातीला विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य मागण्यांसाठी होते; मात्र नंतर संघटित गटांनी विद्यार्थ्यांना भावनिकरीत्या भडकवून आंदोलनाचे हिंसक राजकीय आंदोलनात रूपांतर केले, असा दावा त्यांनी केला. लोकशाही मार्गाऐवजी सत्तापालट घडवून आणण्यासाठी या आंदोलनाचा वापर करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.

हसीना यांनी २०२४ मधील हिंसाचाराच्या चौकशीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हिंसाचाराची सत्यस्थिती समोर येऊ नये म्हणून चौकशी प्रक्रियाच थांबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, सध्याचे सरकार सत्य दडपण्याचा प्रयत्न करत असून देशातील लोकशाही संस्था आणि न्यायव्यवस्था कमकुवत होत आहेत. तसेच बांगलादेशची आर्थिक परिस्थिती आपल्या सरकारच्या काळात अधिक मजबूत होती, असा दावा करत त्यांनी सध्याच्या सरकारवर टीका केली. उद्योग, रोजगार, गुंतवणूक आणि विकासाच्या आघाडीवर देशाची घसरण होत असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच देशात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचाही आरोप त्यांनी केला.

हे ही वाचा:

८८ कोटींच्या घोटाळ्याच्या सूत्रधाराच्या पत्नीला यूएईतून आणले भारतात

शेख हसीनांच्या पत्रकार परिषदेत सहभागी होताच शाकिब यांच्या घरावर हल्ला

ट्रम्प थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टर- प्रवासी विमान समोर येताच काय घडले?

“बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनत आहे”

शेख हसीना यांनी भारत सरकार आणि भारतीय जनतेचे आभार मानले. कठीण काळात भारताने आपल्याला सुरक्षित आश्रय दिला, असे त्या म्हणाल्या. मात्र, त्यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन भारत सरकारने केले नसून ते एका खासगी संस्थेने आयोजित केले होते, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले होते. या पत्रकार परिषदेनंतर बांगलादेश सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली. भारताने अशा कार्यक्रमाला परवानगी दिल्याबद्दल ढाकाने आक्षेप नोंदवला असून, यामुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे.

Exit mobile version