भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक तसेच सामरिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ताकाइची यांच्यात झालेल्या १६व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत संरक्षण, सेमिकंडक्टर, महत्त्वाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य, पुरवठा साखळी, उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक आणि मुक्त इंडो-पॅसिफिकसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
या दौऱ्याचा केंद्रबिंदू केवळ सामरिक संबंध नसून भारतातील जपानी गुंतवणूक वाढवणे, उत्पादन क्षेत्राला चालना देणे आणि आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करणे हा आहे. जपानमधील ५० हून अधिक उद्योग समूहांचे प्रतिनिधीही या दौऱ्यात सहभागी झाले असून सेमिकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रात नवीन गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेत आहेत.
₹३५ हजार कोटींच्या मारुती सुझुकी प्रकल्पाचे उद्घाटन
दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे हरियाणातील खरखौदा येथे उभारण्यात आलेल्या मारुती सुझुकीच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे ₹३५ हजार कोटींच्या गुंतवणुकीत उभारण्यात आलेला हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादन केंद्रांपैकी एक मानला जात आहे. पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या कारखान्यात दरवर्षी १० लाख वाहनांचे उत्पादन होणार असून २१ हजारांहून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ऑटो पार्ट्स, लॉजिस्टिक्स आणि पूरक उद्योगांमध्ये हजारो अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील.
खरखौदा प्रकल्पामुळे भारतातील वाहन उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याबरोबरच निर्यातही वाढवण्याचे लक्ष्य मारुती सुझुकीने ठेवले आहे. या प्रकल्पामुळे भारत जागतिक वाहन उत्पादन केंद्र म्हणून अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही या प्रकल्पामुळे मोठे बळ मिळणार आहे. भारतीय उत्पादन क्षेत्रात जपानी कंपन्यांचा वाढता विश्वास आणि दीर्घकालीन गुंतवणूक याचे हे महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानातील १२५ वर्षे जुन्या गुरुद्वाराच्या तोडफोडीवर भारताचा संताप
इंधनटंचाईवर मात करण्यासाठी रशियाची भारतातून पेट्रोल आयात
डे-केअरमध्ये चिमुकल्यांचा छळ; टॉयलेट जेटस्प्रेने पाणी, वॉशिंग मशीनमध्ये कोंडले
भूकंपग्रस्त भागातून रोकड लुटली; व्हेनेझुएलाच्या चार पोलीस अधिकाऱ्यांना अटक
सेमिकंडक्टर आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर भर
भारत आणि जपानने सेमिकंडक्टर उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करून विश्वासार्ह पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. ईशान्य भारतात उभारल्या जात असलेल्या सेमिकंडक्टर प्रकल्पांमध्ये जपानी कंपन्यांची गुंतवणूक वाढण्याची शक्यता असून या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन भागीदारी विकसित करण्यावर भर देण्यात आला.
संरक्षण सहकार्यालाही प्राधान्य
आर्थिक सहकार्याबरोबरच दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षेवरही चर्चा केली. मुक्त, खुला आणि नियमाधारित इंडो-पॅसिफिक प्रदेश कायम ठेवण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. संरक्षण तंत्रज्ञान, संयुक्त लष्करी सराव आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
