बांगलादेशातील हिंदू व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक

रॅपिड अॅक्शन बटालियनने केली कारवाई

बांगलादेशातील हिंदू व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक

ईशनिंदेच्या आरोपावरून बांगलादेशातील मयमनसिंग जिल्ह्यात, इस्लामी जिहाद्यांच्या जमावाने एका हिंदू तरुणाची निर्घृणपणे मारहाण करून हत्या केली होती. यानंतर अंतरिम सरकारने ‘नव्या बांगलादेशात अशा हिंसाचाराला स्थान नाही’ असे प्रतिपादन केले होते आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही अशी शपथ घेतली होती. यानंतर आता मयमनसिंग जिल्ह्यात हिंदू तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

युनूस प्रशासनाने पीडित तरुणाची ओळख दिपू चंद्र दास अशी केली असून तो २७ वर्षीय हिंदू होता. एक्सवरील एका पोस्टमध्ये युनूस म्हणाले, मयमनसिंगमधील बालुका येथे दिपू चंद्र दास (वय २७) या सनातन हिंदू तरुणाच्या मारहाणीत झालेल्या हत्येप्रकरणी रॅपिड अॅक्शन बटालियन (RAB) ने सात जणांना संशयित म्हणून अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे. मोहम्मद लिमन सरकार (वय १९ वर्षे), मोहम्मद तारेक हुसेन (वय १९ वर्षे), मोहम्मद माणिक मिया (वय २० वर्षे), इरशाद अली (वय ३९ वर्षे), निजुम उद्दीन (वय २० वर्षे), आलोमगीर हुसेन (वय ३८ वर्षे) आणि मोहम्मद मिराज हुसेन अकोन (वय ४६ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. युनूस म्हणाले की, परिसरातील RAB युनिट्सनी समन्वित कारवाई केल्यानंतर ही अटक करण्यात आली.

पीडित दिपू चंद्र दास हा भालुका उपजिल्ह्यातील दुबालिया पारा भागात भाडेकरू म्हणून राहत असलेला एक तरुण कपड्याच्या कारखान्यातील कामगार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवाशांच्या एका गटाने त्याच्यावर प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप केला आणि गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर हल्ला केला.

हे ही वाचा..

पाकिस्तान: आत्मघातकी बॉम्बरने लष्करी चौकीवर घडवला स्फोट; चार सैनिक ठार

आसाममध्ये झालेल्या अपघातात आठ हत्तींचा मृत्यू; राजधानी एक्सप्रेसचे पाच डबे घसरले

सीरियामध्ये ISIS विरुद्ध अमेरिकेचे ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’!

जम्मू- काश्मीर: किश्तवाड जिल्ह्यामधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्याशी संबंध

गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उठावातील एक प्रमुख व्यक्ती आणि इन्किलाब मंचाचे प्रवक्ते, युवा नेते शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या अशांततेदरम्यान ही हत्या घडली होती. १२ डिसेंबर रोजी ढाका येथे मुखवटा घातलेल्या बंदूकधारींनी डोक्यात गोळी झाडल्यानंतर हादी याचे गुरुवारी सिंगापूरमधील रुग्णालयात निधन झाले.

Exit mobile version