उन्हाळा सुरू होताच आरोग्याशी संबंधित समस्या वाढू लागतात. या काळात उपाशीपोटी घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते. तीव्र उन्ह, घाम आणि डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, उलटी किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात काही आवश्यक काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
नॅशनल हेल्थ मिशनच्या माहितीनुसार, उन्हाळ्यात शरीराचे तापमान वेगाने वाढते. उपाशीपोटी बाहेर पडल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे थकवा, चक्कर आणि बेशुद्ध पडण्याचा धोका वाढतो. तसेच, जास्त तेलकट आणि जड अन्न पचनसंस्थेवर ताण आणते आणि शरीर अधिक गरम करते. त्यामुळे तज्ज्ञ उन्हाळ्यात काही सोपे उपाय अवलंबण्याचा सल्ला देतात.
हेल्थ मिशनचे म्हणणे आहे की, उन्हाळ्यात स्वतःचे संरक्षण करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. छोट्या-छोट्या काळजीमुळे आपण उष्माघात आणि इतर आजारांपासून वाचू शकतो. विशेषतः घरातील वयोवृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींची अधिक काळजी घ्यावी. निरोगी राहण्यासाठी हलका व संतुलित आहार, भरपूर पाणी आणि उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे.
काही महत्त्वाच्या सूचना :
- उपाशीपोटी बाहेर पडू नका: घराबाहेर जाण्यापूर्वी हलका नाश्ता करा. फळे, दही, ताक किंवा सुकामेवा खाणे फायदेशीर आहे.
- पुरेसे पाणी प्या: दिवसभरात ३-४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. लिंबूपाणी, नारळपाणी, ताक किंवा ओआरएस द्रावण घेणेही उपयोगी ठरते.
- तेलकट अन्न टाळा: जास्त तेलकट, मसालेदार आणि फास्ट फूड कमी खा. हलके, पचायला सोपे आणि ताजे अन्न घ्या।
- सैल आणि हलके कपडे घाला: सुती, फिकट रंगाचे आणि सैल कपडे परिधान करा, ज्यामुळे हवा खेळती राहते.
- दुपारी १२ ते ४ दरम्यान बाहेर जाणे टाळा: या वेळेत ऊन सर्वाधिक तीव्र असते. आवश्यक असल्यास छत्री किंवा टोपी वापरा.
याशिवाय, ताप, उलटी, मळमळ, बेशुद्धी, अशक्तपणा, जास्त तहान लागणे, लघवी कमी होणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.







