“वर्क फ्रॉम होम स्वीकारा, पेट्रोल वाचवा, एक वर्ष सोने खरेदी करू नका”

जागतिक तेलसंकटावर पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन

“वर्क फ्रॉम होम स्वीकारा, पेट्रोल वाचवा, एक वर्ष सोने खरेदी करू नका”

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलसंकटाचे परिणाम आता भारतावरही दिसू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल- डिझेलचा वापर कमी करण्याचे, अनावश्यक परदेश प्रवास टाळण्याचे आणि अगदी एक वर्ष लग्नसमारंभांसाठी सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या परिस्थितीत परकीय चलनाची बचत करणे देशहितासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढत्या किमती आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (१० मे) तेलंगणातील सिकंदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, कोरोना काळात देशाने ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाइन मीटिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या पद्धती यशस्वीपणे स्वीकारल्या होत्या. आता पुन्हा त्या सवयी अंगीकारण्याची गरज आहे. ते म्हणाले, “कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वीकारले होते. आता पुन्हा त्या सवयी स्वीकारण्याची वेळ आली आहे, कारण ते राष्ट्रीय हिताचे आहे.”

जागतिक स्तरावर वाढणाऱ्या इंधनदरांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, “संपूर्ण जगात पेट्रोल-डिझेल अत्यंत महाग झाले आहे. पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी जो परकीय चलन खर्च होतो, तो वाचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.” आपल्या भाषणात त्यांनी लोकांना खर्चांमध्ये संयम बाळगण्याचे आवाहन करताना म्हटले, “मी लोकांना विनंती करतो की, त्यांनी एक वर्ष लग्नासाठी सोने खरेदी करू नये.”

दरम्यान, पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील पुरवठा अडथळ्यांमुळे कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल सुमारे ७० डॉलरवरून तब्बल १२६ डॉलरपर्यंत पोहोचल्या आहेत. जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतूक या समुद्री मार्गातून होते. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी तेल कंपन्यांना दरमहा सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकार आणि तेल कंपन्या पेट्रोलवर प्रतिलिटर सुमारे २४ रुपये आणि डिझेलवर ३० रुपये इतका अतिरिक्त भार स्वतः उचलत आहेत, जेणेकरून ग्राहकांना तातडीचा दिलासा मिळू शकेल. मात्र, येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होऊ शकते, तर घरगुती एलपीजी सिलेंडर ४० ते ५० रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांनी केवळ इंधनच नव्हे तर खाद्यतेल आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, “खाद्यतेलाच्या आयातीवरही परकीय चलन खर्च होते. प्रत्येक कुटुंबाने खाद्यतेलाचा वापर थोडा कमी केला, तरी ते देशभक्तीचे मोठे योगदान ठरेल.”

हे ही वाचा:

असिम मुनीर म्हणतात, २०२५ चा संघर्ष ‘दोन विचारप्रणालींची लढाई’

१३ चेंडूत अर्धशतक! उर्विल पटेलची चेपॉकवर षटकारांची सुनामी

मोदी रेवंथ रेड्डींना म्हणाले, माझ्यासोबत या!

दुर्मिळ पक्ष्यांच्या शोधात गेले… आणि ठरले हंता व्हायरसचे ‘पेशंट झिरो’!

कृषी क्षेत्राचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, भारत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांची आयात करतो. त्यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आणि रासायनिक खतांचा वापर निम्म्यावर आणण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आपण रासायनिक खतांचा वापर अर्ध्यावर आणला पाहिजे आणि नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे. त्यामुळे परकीय चलनाची बचत होईल आणि आपली जमीन तसेच शेतीही सुरक्षित राहील.”

माहितीनुसार, सध्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने एलपीजी उत्पादन ३६ हजार टन प्रतिदिनवरून ५४ हजार टन प्रतिदिनपर्यंत वाढवले आहे. तसेच रशिया, अमेरिका आणि पश्चिम आफ्रिकेतून कच्च्या तेलाची आयात वाढवण्यात आली असून रिफायनऱ्या १०० टक्क्यांहून अधिक क्षमतेने चालवल्या जात आहेत. केंद्र सरकारने आधीच आंतरराष्ट्रीय दरवाढीचा परिणाम कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात केली आहे. मात्र, जागतिक परिस्थिती आणखी बिघडल्यास येत्या काळात सर्वसामान्यांवर महागाईचा अतिरिक्त भार पडू शकतो.

Exit mobile version