महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या भाषणानंतर अनेकांनी त्यावर टीका केली. मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंकबाबत खोट्या बातम्या पसरवल्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होतो, असे फडणवीस म्हणाले होते. अशा बातम्या पसरवणाऱ्यांना त्यांनी भाडे के टट्टू अशी उपमा दिली. त्यावरूनही खूप टीका झाली. त्याला देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी केलेल्या भाषणातून दिले.
ते म्हणाले की, परवा मी विधान सभेत भाषण केल्यानंतर अनेक लोकांना मिर्ची लागली. पण मी स्पष्ट केले होते की, मिसिंग लिंकवर त्या ठिकाणचा पूल, केबल स्टेड ब्रिज किंवा जगातले सगळ्यात मोठे बोगदे आहेत, त्यापैकी एकालाही तडा गेलेला नाही. काही जणांनी टीका केली ७ हजार कोटी रुपये पाण्यात गेले. हा माझा अपमान नाही, महाराष्ट्राचाच अपमान आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, भाडे की टट्टू म्हटले, तर काही लोक म्हणाले मुख्यमंत्री सुसंस्कृतपणे बोलत नाहीत. भाडे के टट्टू म्हणालो तर काही जण म्हणाले की हिंदीत का बोलले. म्हणून त्यांना मी आता ‘भाटक गदर्भ’ म्हणतो. कोणाला समजले नसले तर सांगतो की याचा अर्थ सुपारीबाज असा आहे. मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो होतो. टोपी फेकली होती. मात्र, अनेकांना ती लागली. एक वाक्य हिंदीत बोललो. ते ज्यांना समजायला पाहिजे त्यांच्याऐवजी दुसऱ्यांनाच मिर्ची लागली. हिंदीत का बोललो, असे मिमिक्री आर्टिस्ट बोलले. ते आमचे मित्र आहेत. त्यांचा राजकारणात आम्हाला धोका नाही. ‘ते जर स्टँडअप कॉमेडीयन क्षेत्रात गेले तर अनेकांचा कॉमेडीचे दुकान बंद केले असते असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.
…त्या शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफीमध्ये ५० हजारांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली होती, मात्र त्यामागे कर्जफेडीसाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता परंतु आता त्यांना देखील दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, अशी घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तीन वर्षांपैकी दोन वर्ष ज्यांनी पैसे भरले आहेत, ते सर्व शेतकरी आता या योजनेसाठी पात्र होतील, पहिल्यांदा असा निर्णय झाला आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीतील लोकांना महात्मा ज्योतिराव फुले योजनेत वगळण्यात आले. ३४ लाख शेतकऱ्यांना ४ हजार कोटी रुपये २००० साली दिले होते. त्यांनी नीट कर्ज भरले पाहिजे म्हणून आपण प्रोत्साहन देतोय. रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार मला भेटले. ५० हजार रुपयांची अट काढण्याची मागणी त्यांनी केली. व्यापक विचार करायला हवा असे ते म्हणाले. त्यामुळे आता आपण नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांऐवजी २ लाख रुपयांचं नियमित अनुदान देणार आहोत, असं फडणवीस म्हणाले.
