राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या दालनात पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांचा पक्ष सरकारमध्ये येणार का अशा चर्चा होत असून याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील धुसपूस चव्हाट्यावर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सर्व घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा कृतीमुळे मोठ्या नेत्याच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“शरद पवार हे नक्कीच मोठे आणि आदरणीय नेते आहेत. मात्र, ज्या गद्दारांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले, अशा व्यक्तीच्या छताखाली जाऊन पक्षाची बैठक घेणे योग्य नाही. अशा कृतीमुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी शरद पवारांबद्दलची नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला गद्दारी आणि भ्रष्टाचाराची कीड, वाळवी लावली. अशा व्यक्तीच्या कार्यालयात जाऊन बैठक घेण्याची गरज नव्हती. विधानभवन ओस पडले होते का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. बैठक घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते.”
राऊत यांनी स्पष्ट केले की, “हे आमच्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचेही मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेणार नाही. आमचे मन एवढे मोठे नाही आणि आम्ही असे कधी करणारही नाही. ज्यांना ते योग्य वाटत असेल त्यांनी ते करावे, पण आम्हाला ते मान्य नाही. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते.”
“ज्यांनी विश्वासघात केला, त्यांच्याशी व्यवहार करताना सर्वांनी पथ्य पाळले पाहिजे. आम्ही असतो तर अजित पवार यांच्या गटाच्या कार्यालयात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती. त्यांनी शरद पवारांशी बेईमानी केली आहे हे लक्षात ठेवले असते. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी.” असे मत संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
मुंबईतील प्रसिद्ध ‘के रुस्तम’ आइसक्रीम ब्रँडचे फूड लायसन्स निलंबित
महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के; लातूरसह अनेक जिल्ह्यांत हादरे
सरकारी नोकरी, संपत्तीच्या लालसेपोटी मुलीनेच रचला आईच्या हत्येचा कट
“भारत-पाक युद्ध अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते” ट्रम्प यांचा पुन्हा युद्ध थांबवल्याचा दावा
शरद पवारांचा पक्ष सत्ताधारी पक्षांसाबोत जाणार नाही पण, कालच्या कृतीची गरज नव्हती. यातून महाराष्ट्राला काय दाखवायचे आहे. गद्दारांना प्रतिष्ठा देण्याचे काम तुम्ही करत आहात. तुमच्या पक्षातही गद्दारी झालेली आहे मग त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याविरोधात न्यायालयात जाणं, बोलणं हे कशासाठी आहे. आम्ही आमच्या गद्दारांविरोधात लढत आहोत तर तुम्ही जाऊन त्यांना प्रतिष्ठा का देत आहात? आमच्या मनाला ही गोष्ट लागलेली आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
