माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यानंतर सोमवारी प्रथमच संसदेत हजेरी लावत राजकीय संदेश दिला. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्याशी झालेल्या थोडक्यात संवादात त्यांनी स्वतःला “रस्त्यावरचा लढवय्या” असे संबोधत आपल्या राजकीय भूमिकेचा स्पष्ट संकेत दिला.
संसद भवनाच्या मकर द्वारावर धमेंद्र प्रधान यांच्या आगमनापूर्वी एनडीएचे खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संसद परिसरात पोहोचताच पक्षाच्या सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले, त्यांना आतपर्यंत सोबत नेले आणि प्रतीकात्मक स्वरूपात टोपी परिधान करून त्यांचा सन्मान केला.
धमेंद्र प्रधान हसतमुखाने संसदेत दाखल झाले. यावेळी एका भाजप खासदाराने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “वैयक्तिक आरोप नसताना केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.” याच दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी धमेंद्र प्रधान यांची भेट घेत त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
“असं होत असतं,” असे जयराम रमेश म्हणाले. त्यावर धमेंद्र प्रधान यांनी तत्काळ उत्तर दिले, “काहीच झालेलं नाही. मी एसी रूममधला कार्यकर्ता नाही. मी रस्त्यावरचा लढवय्या आहे.” हा संवाद भाजपच्या नेत्यांनी प्रधान यांच्या राजकीय आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही ते सक्रिय राजकारणात तितक्याच ताकदीने काम करण्यास सज्ज असल्याचा हा संदेश असल्याचे पक्षातील नेत्यांचे मत आहे.
हे ही वाचा:
कॉक्रोच आंदोलक आपल्या नावाप्रमाणेच दिसतात आणि वागतात!
‘नीट’ परिक्षेत फक्त ११ गुणांनी कटऑफ हुकल्याने विद्यार्थीनीने जीवन संपवले
भारतीय खलाशाच्या मृत्यूनंतर युक्रेनच्या राजदूतांना समन्स
मालीत भारतीय हिरे व्यापाऱ्याचे अपहरण; ४४ कोटींची ‘डील’
भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची चर्चा
धमेंद्र प्रधान हे ओडिशातील भाजपचे प्रमुख नेते मानले जातात. त्यांना यापूर्वीही अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. अलीकडेच त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे प्रभारी म्हणून काम केले होते. त्यानंतर पश्चिम बंगालमधील प्रचारातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर त्यांच्याकडे हरियाणा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती, जिथे भाजपने पुन्हा सत्ता कायम राखली. यापूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक या राज्यांमधील निवडणुकांमध्येही त्यांनी पक्षासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
पक्षातील सूत्रांच्या मते, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजपमध्ये महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी किंवा निवडणूक प्रभारीपद दिले जाऊ शकते.
राजीनाम्यानंतर भाजपचा भक्कम पाठिंबा
नीट २०२६ पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांवरून झालेल्या आंदोलनानंतर धमेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच भाजप अध्यक्ष नितीन नवीन आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत सार्वजनिकपणे त्यांना पाठिंबा दिला.
भाजपने स्पष्ट केले आहे की, धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट नसून “राजकीय उत्तरदायित्व, त्याग आणि राष्ट्रीय हितासाठी घेतलेला निर्णय” आहे.
संसदेत विरोधकांचे आंदोलन
धमेंद्र प्रधान यांच्या स्वागताचा कार्यक्रम सुरू असतानाच काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस अत्याचाराच्या मुद्द्यावर संसद परिसरात आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांचा प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ मांडण्यात येणार असून, त्यावर सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे.
