स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये वंदे मातरम हे गीत संपूर्ण वाजवले गेल्यानंतर ते सोनिया गांधी यांनी थांबवले. त्यावरून देशभरात संताप व्यक्त होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सोनिया गांधींच्या समर्थनार्थ धावून आले आहेत.
त्यांनी सोनिया गांधी यांची यात कोणतीही चूक नाही, उलट त्यांनी केले ते परंपरेला धरूनच होते, असे म्हटले. वंदे मातरमची केवळ दोन कडवीच गायली जात असताना पुढची कडवी कशाला गायची असेही आव्हाड म्हणाले.
पत्रकारांनी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की, मी पूर्ण चित्रिकरण पाहिलं. वंदे मातरम या राष्ट्रगानाच्या दोन कडव्यांनाच मान्यता देण्यात आली होती. काही शब्दांवर त्या काळात आक्षेप घेण्यात आला. ती कडवी म्हटली जात नव्हती.
हे ही वाचा:
भिंत फोडताच कामगारांना सापडला ९९ कोटींचा सोन्याचा खजिना
नालासोपाऱ्यात केक खाऊन अनेकजण अस्वस्थ
संविधानाची प्रत घेऊन फिरणाऱ्यांची त्यावर श्रद्धा मात्र नाही
उदय सामंतांच्या दौऱ्याआधी चाकण एमआयडीसीत रातोरात खड्डे बुजवले
पण सोनिया गांधी यांना हे कळलं की, पुढची कडवी गायली जात आहेत, मला त्यांचं कौतुक वाटतं. भारतीय संविधानाची, परंपरेची जाण असलेली स्त्री आहे ती. त्यांनी पटकन मध्यस्थी करून वंदे मातरम थांबवण्यास सांगितले. हे एका अत्यंत सावध मनाचे लक्षण आहे. त्यात काहीही चूक नाही त्यांची. दोन कडव्यांनंतर तिसऱ्या कडव्याला मान्यताच नाही. आपण एवढी वर्ष ऐकतोय हे गीत. आपण दोन कडव्यानंतर वंदे मातरम म्हणतच नाही मग पुढची कडवी म्हणायची कशाला?
सोनिया गांधी यांनी जे केलं ते योग्य केलं. ही भारतीय संस्कृतीची लक्षणं आहेत. भारताची परंपरा त्यांनी आत्मसात केली आहे. त्यांचे लहानपण इटलीत गेलं. त्यांचं तारुण्य भारतात गेलंय. त्या भारताला जास्त ओळखतात. त्याबद्दल त्याचं कौतुक केलं पाहिजे, असंही आव्हाड म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, स्वतःच्या पक्षात हे झालेलं असतानाही त्यांनी आक्षेप घेतला, हे महत्त्वाचे. काँग्रेसनेच तिसऱ्या कडव्याला आक्षेप घेतला आहे. तरीही काँग्रेसच्या कार्यक्रमात ते वाजलं हेच आश्चर्यजनक आहे.
