कोल्हापूरचे नेते समरजीत घाटगे यांनी पुन्हा एकदा भाजपची साथ देण्याचा निर्णय घेत पक्षामध्ये घरवापसी केली आहे. समरजीत घाटगे यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये आपल्या समर्थकांसह पक्ष प्रवेश केला आहे. २०२४ विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
यासंबंधी प्रतिक्रिया देताना समरजीत घाटगे म्हणाले की, “मी माझ्या मूळ पक्षात परत आलो आहे. त्यामुळे कोणालाही अडचण होण्याचे कारण नाही.” त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे मतभेद संपल्याचेही स्पष्ट केले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचे समन्वय दिसून आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यातील वाद मिटवला असून पुढेही आम्ही एकत्र काम करू,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. घाटगे यांनी सांगितले की, त्यांचा भाजप प्रवेश काही दिवसांपासून प्रलंबित होता. “नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आमचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. अधिवेशनानंतर अधिकृत प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
सीझफायरवर सहमती, पण लेबनॉनचा समावेश नाही
होर्मुझ नियंत्रण, नुकसान भरपाई; काय आहे इराणचा १०-कलमी प्रस्ताव?
अमेरिका इराण युद्धविराम; होर्मुझ सामुद्रधुनी उघडणार
खरातच्या व्हिडीओची विक्री, महाराष्ट्र सायबर सेल कडून गुन्हा
दरम्यान, घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना म्हटले की, “ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. पक्षाबाहेर असतानाही मी त्यांच्या नावाचा उल्लेख करत होतो. आता पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.” तसेच पुढे ते म्हणाले की, भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्यापूर्वी आपण शरद पवार यांची भेट घेतली होती.







