ममतांना दणका; राज्यसभा खासदार प्रकाश चिक बाराईक यांचा राजीनामा

राजीनामा देणाऱ्या तृणमूलच्या राज्यसभा खासदारांची संख्या तीनवर

ममतांना दणका; राज्यसभा खासदार प्रकाश चिक बाराईक यांचा राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना आणखी एक दणका मिळाला असून खासदाराने राजीनामा दिला आहे. राज्यसभा खासदार प्रकाश चिक बाराईक यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. यामुळे तृणमूल कॉंग्रेसला गुरुवारी (११ जून) आणखी एक धक्का बसला. सुखेंदू शेखर रॉय आणि सुष्मिता देव यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा राजीनामा आला असून, त्यामुळे गेल्या काही दिवसांत राजीनामा देणाऱ्या तृणमूलच्या राज्यसभा खासदारांची संख्या तीन झाली आहे.

बराईक यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेतील पक्षाचे संख्याबळ १० खासदारांपर्यंत कमी होणार आहे. याशिवाय पुढील आठवड्यात तृणमूलचे आणखी तीन राज्यसभा खासदार राजीनामा देऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आले आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षापुढील संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत एकापाठोपाठ एक झालेल्या पराभवानंतर भाजपविरोधात राष्ट्रीय विरोधी रणनीती आखण्यासाठी आणि आपल्या पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जी दिल्लीत सोनिया गांधी यांच्यासह इंडिया ब्लॉकच्या नेत्यांसोबत अनेक बैठकांमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी, सोमवारी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी सुखेंदू शेखर रॉय यांनी राजीनामा दिला आणि तृणमूलच्या खासदारांमधील संकटाला सुरुवात झाली.

दिवसेंदिवस ममता बॅनर्जी यांची त्यांच्या विधिमंडळ पक्षावरील पकड कमकुवत होत असल्याचे दिसत आहे, कारण त्यांच्या ८० आमदारांपैकी ५८ आमदारांनी बंडखोर आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. आता हा आकडा ६४ वर पोहोचला आहे. ममता बॅनर्जी यांच्या सहकाऱ्यांनीच ऋतब्रता बॅनर्जी यांची बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे, ज्यामुळे ममता यांना मोठा धक्का बसला आहे. ऋतब्रता यांनी असा दावा केला आहे की, येत्या काही दिवसांत आणखी आमदार बंडखोर गटात सामील होतील.

हे ही वाचा:

होर्मुझजवळ जहाजावरील हल्ल्यानंतर दोन भारतीय खलाशी ठार; मुख्य अभियंता बेपत्ता

मणिपूर: बेपत्ता झालेल्या नागा समुदायातील सहा जणांचे सापडले मृतदेह

भारतात ‘फिफा विश्वचषक’ मोफत पाहता येणार?

२२% ते ३०% इथेनॉल असलेल्या पेट्रोलला उत्पादन शुल्कातून सूट

विधानसभेत ममता बॅनर्जी यांचे सभागृह पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळत असतानाच, हे बंड लवकरच दिल्लीत पसरले. राज्यसभेत, १३ वर्षे पक्षाचे मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) राहिलेल्या रॉय यांनी राजीनाम्यांची लाट आणली. त्यांच्यापाठोपाठ बुधवारी सुष्मिता देव आणि गुरुवारी बराईक यांनीही राजीनामा दिला.

Exit mobile version