जेपीएससी आणि जेएसएससीच्या भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेले झारखंडमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी २०व्या दिवशीही सुरू आहे. आंदोलनाच्या पुढील टप्प्याच्या पार्श्वभूमीवर रांची जिल्हा प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी २० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घालण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांनी अद्याप याबाबत औपचारिक घोषणा केलेली नसली, तरी गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर कांके रोडवरील मुख्यमंत्री निवासस्थान आणि परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी १०० हून अधिक अतिरिक्त सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये झारखंड जगुआर आणि झारखंड आर्म्ड पोलिसांच्या जवानांचा समावेश आहे. सूचना भवन चौक ते राम मंदिर चौकापर्यंत बॅरिकेडिंग करून सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाच्या आसपासच्या सुमारे ५०० मीटर परिसरात सुरक्षा विशेषतः कडक करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव सूचना भवनकडून एटीआयकडे जाणारा मार्गही बंद करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरावर ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची माहिती आहे. सुरक्षा व्यवस्थेमुळे कांके रोडवरील वाहतुकीवरही परिणाम झाला असून, मोराबादी आणि कचहरी चौकाकडून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळवले जात आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या २० दिवसांपासून जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये सुरू आहे. जेपीएससी आणि जेएसएससीच्या वादग्रस्त भरती परीक्षांची निष्पक्ष चौकशी तसेच परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. जेपीएससी नागरी सेवा आणि जेएसएससी-सीजीएल परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटीची सीबीआय चौकशी ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.
हे ही वाचा:
स्वच्छतेचा फज्जा, डॉमिनोजला झटका; सातारासह मुंबईतील चार आउटलेट्सचे परवाने रद्द
रेवण्णाच्या कोठडीतून जप्त केलेल्या फोनमध्ये ९० अश्लील व्हिडिओ
पाक गृहमंत्र्यांकडून हाफिज सईदचे गुणगान; भारताला धमकी
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटामागे अल-कायदा?
१० ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी विधानसभा घेराव आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा (वॉटर कॅनन) आणि अश्रुधुराचा वापर केला. त्यानंतर लाठीमारही करण्यात आला. या कारवाईनंतर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. जोपर्यंत सरकार त्यांच्या प्रमुख मागण्यांवर ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.
