‘तरुणांना ओळखच नाही दिली’; योगींचा राहुल-अखिलेशवर जोरदार हल्लाबोल

सिद्धार्थनगरमध्ये ३११ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

‘तरुणांना ओळखच नाही दिली’; योगींचा राहुल-अखिलेशवर जोरदार हल्लाबोल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिद्धार्थनगर येथील कार्यक्रमात काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. ३११ कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या १०७ विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करताना योगी यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावर तरुणांच्या प्रश्नावरून टीका केली. काँग्रेसने देशातील आणि समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील तरुणांसमोर ‘ओळखीचे संकट’ निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला देश आणि उत्तर प्रदेशात अनेक वर्षे सत्ता मिळाली, मात्र त्यांनी तरुणांसाठी नेमकं काय केलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या काळात दहशतवाद, दंगली, अशांतता आणि उपद्रवामुळे सर्वाधिक फटका तरुणांना बसल्याचा दावा योगींनी केला. त्यांच्या मते, आज परिस्थिती बदलली असून तरुण केवळ नोकरीच्या शोधात भटकणारा नसून रोजगार निर्माण करणारा बनत आहे. देशात उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी नव्या व्यवस्थेची निर्मिती झाल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
लंकादहनासाठी टीम इंडिया सज्ज; विक्रमांसाठी हनुमानउडी!

सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत हलवणार

शरीफ सरकार गुडघ्यावर…पीओके आंदोलक दहशतवादी नव्हेतर ‘देशभक्त’

निवडणुकीशिवाय सत्तापालटाची १९८ सूत्रे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत देशात वेगाने विकास झाला असल्याचा दावा योगींनी केला. सिद्धार्थनगरचा विकासाच्या बाबतीत वेगाने पुढे येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये समावेश होत असल्याचे त्यांनी नमूद केले. नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात सिद्धार्थनगरला मिळालेल्या कामगिरीचाही त्यांनी उल्लेख केला.

तरुणांसाठी चांगले शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योजकता या चार गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे योगी म्हणाले. त्यांच्या दाव्यानुसार, गेल्या १२ वर्षांत देशात १७ कोटी लोकांना रोजगार मिळाला असून देशभरात १७ हजारांहून अधिक  स्किलिंग सेंटर आणि १५ हजारांहून अधिक आयटीआय कार्यरत आहेत. आरोग्य क्षेत्रातील वाढीचाही त्यांनी उल्लेख केला. २०१४ मध्ये देशात ४३१ मेडिकल कॉलेज होती, तर २०२५ पर्यंत ही संख्या ८१८ वर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एमबीबीएसच्या जागांची संख्या ५१ हजार ३४१ वरून १ लाख २८ हजार ९२६ झाल्याचा दावा त्यांनी केला.

या भाषणातून योगी आदित्यनाथ यांनी विकासाच्या मुद्द्यांसोबतच तरुण मतदारांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत विरोधकांवर राजकीय हल्ला चढवला. त्यामुळे उत्तर प्रदेशात आगामी काळात रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास आणि तरुणांच्या भवितव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version