पंतला संधी, तर ‘या’ युवा खेळाडूवर मोठा विश्वास

पंतला संधी, तर ‘या’ युवा खेळाडूवर मोठा विश्वास

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ६ जूनपासून रंगणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी आपल्या पसंतीची टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या ऋषभ पंतला त्यांनी संघात स्थान देत मोठा विश्वास दाखवला आहे.

आकाश चोप्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलामीवीर म्हणून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीची निवड केली. या जोडीने अलीकडे चांगली कामगिरी केल्याने त्यात कोणताही बदल करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तिसऱ्या क्रमांकासाठी आकाश यांनी युवा फलंदाज साई सुदर्शन याला पसंती दिली. सुदर्शनला अधिकाधिक संधी मिळायला हव्यात, असे मत व्यक्त करत त्यांनी त्याच्या प्रतिभेवर विश्वास दाखवला. तर संघाचा कर्णधार शुभमन गिल याने चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी, असेही त्यांनी सांगितले.

सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो ऋषभ पंतचा. खराब फॉर्म असूनही पंत हा सामना फिरवण्याची क्षमता असलेला खेळाडू असल्याचे सांगत आकाश यांनी त्याला पाचव्या क्रमांकावर स्थान दिले. त्याचबरोबर ध्रुव जुरेललाही अंतिम अकरामध्ये संधी देण्यात आली आहे. जुरेलने अलीकडच्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी केली असून आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठीही त्याने प्रभावी खेळी केल्या आहेत.

अष्टपैलू खेळाडू म्हणून वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली आहे. मात्र, संघाला अतिरिक्त फलंदाजीची गरज वाटल्यास ध्रुव जुरेलच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी दिली जाऊ शकते, असेही आकाश यांनी नमूद केले.

गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असल्यास गुरनूर बरारला कसोटी पदार्पणाची संधी द्यावी, असे त्यांनी सुचवले. मात्र, जर खेळपट्टी फिरकीस पोषक ठरली, तर हर्ष दुबे किंवा मानव सुथार यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

आकाश चोप्रांची भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

१. केएल राहुल
२. यशस्वी जैस्वाल
३. साई सुदर्शन
४. शुभमन गिल (कर्णधार)
५. ऋषभ पंत
६. ध्रुव जुरेल
७. वॉशिंग्टन सुंदर
८. कुलदीप यादव
९. प्रसिद्ध कृष्णा
१०. मोहम्मद सिराज
११. गुरनूर बरार / हर्ष दुबे

अफगाणिस्तानविरुद्धच्या या एकमेव कसोटीत भारत कोणत्या संयोजनासह मैदानात उतरतो, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः ऋषभ पंत, साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल यांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.

Exit mobile version